म. टा. वृत्तसेवा, भंडारा
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांना विजयाची खात्री असताना अनपेक्षित निकाल लागल्याने पक्षात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर राजकीय पकड असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा अडचणीत सापडल्याने पुन्हा नव्या जोमाने उभारी घेण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. आता ईडीने राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांच्या चौकशीचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १९९९मध्ये स्थापना झाल्यानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात या पक्षाने मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली. ही फळी कमी-अधिक प्रमाणात आजही कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर राहायचा. सहकार क्षेत्र, पालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा राहत होता. २००४ मध्ये १५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली भंडारा विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. त्यानंतर २००९ ची लोकसभा निवडणूक प्रफुल्ल पटेल यांनी मोठ्या फरकाने जिंकली. त्यावेळी भाजपचे अस्तित्व नाममात्र होते. परंतु, २०१४ मध्ये मोदी लाटेत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून पक्षाला उतरती कळा लागली. त्याच वर्षी झालेली विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्र लढले. तेव्हा तीनही आमदार भाजपचे निवडून आले. अनेक वर्षे नगर परिषदांवर सत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला २०१६ च्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला.
पक्षाची अशी दाणादाण झाल्याचे पाहून खा. पटेल यांना स्वत: पुढाकार घ्यावा लागला. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर २०१८मध्ये झालेली पोटनिवडणूक पटेल यांनी गांभीर्याने घेतली होती. त्यांना काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांची साथ मिळाली. तत्पूर्वी, खासदार पटेल यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खडसावत, त्यांचे कान टोचत कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आणि पक्षात पुन्हा नवचैतन्य आले.
या पोटनिवडणुकीच्या अवघ्या ११ महिन्यानंतर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा सुमारे दोन लाख मतांनी पराभव केला. कोणत्याही परिस्थितीत ही जागा आपण जिंकू, असा प्रचंड आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर होता. परंतु, झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पराभवाच्या या धक्क्यातून सावरत पुढच्या निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान आता पक्षापुढे असणार आहे.
इच्छुकांचा उत्साह मावळला
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नेत्यांमध्ये लोकसभेपूर्वी प्रचंड आत्मविश्वास होता. परंतु, निकालात सर्वच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेही मतांची लीड नाही. सर्वच बुथवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे इच्छुकांचा आत्मविश्वास मावळला आहे.
'खचू नका, कामाला लागा'
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला पराभव खा. प्रफुल्ल पटेल यांनी गांभीर्याने घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीची कारणीमिमांसा केली. तसेच पराभवाने खचू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा, असे आवाहन करीत बळ देण्याचा प्रयत्न केला.