म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
हवामानातील बदलांमुळे कृषी क्षेत्रावर होत असलेल्या परिणामांवर संसदेच्या कृषिविषयक स्थायी समितीने तीव्र चिंता व्यक्त करून, यासंदर्भातील संशोधन व उपाययोजनांबाबत कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा केली.
संसदेच्या कृषीविषयक स्थायी समिती दोन दिवसांपासून अभ्यास दौऱ्यावर आली आहे. समितीचे अध्यक्ष खासदार पार्वतागौडा गड्डीगौडार व सदस्यांनी शुक्रवारी कृषिसंशोधन परिषद, केंद्रीय कापूस संसोधन संस्था, मृदसंधारण, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राला भेट देऊन संस्था प्रमुख व कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा केली. ३१ सदस्यीय समितीतील ११ सदस्यच आले असून, तारांकित हॉटेलमधील बैठक व मुक्कामाची दोन दिवसांपासून चर्चा रंगली.
मृदा व्यवस्थापन व तंत्रज्ञानाबाबत समितीच्या सदस्यांनी अधिक रस दाखवला. मृदा व्यवस्थापन काळाची गरज असल्याचे मतही सदस्यांनी व्यक्त केले. खासदार नवनीत राणा यांनी वैज्ञानिक डॉ. एन. जी. पाटील व इतर तज्ज्ञांशी राज्यातील मृदाव्यवस्थापन व इतर मुद्यांवर चर्चा केली. खासदार रामकृपाल यादव यांनी शेतकऱ्यांमधील नैराश्य दूर करण्याचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटकातील सुजला प्रकल्पाला एनबीएसएसने दिलेल्या तांत्रिक सहकार्याचे समितीचे अध्यक्ष गड्डीगोदार यांनी कौतुक केले. रसायनाच्या वापराचा मृदावर होणाऱ्या परिणामबाबत काय उपाययोजना करण्यात येत आहेत, हे देवजी मानसिंगराम पटेल यांनी जाणून घेतले. आयसीएआरचे संचालक डॉ. पी. चंद्रन यांनी संस्थेच्या कामाची सविस्तर माहिती दिली. देशातील मृदेचे सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्याच्या कामात केंद्राने उल्लेखनीय योगदान दिले, असे रिमोट सेन्सिंगचे प्रमुख डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी सांगितले. अतिरिक्त महासंचालक डॉ. एस. के. चौधरी यांनी संस्थेकडून करण्यात येत असलेल्या संशोधनाची माहिती दिली.
.......