यवतमाळ :
'आधीच्या सरकारांनी गेल्या ५० वर्षात खोदलेले खड्डे बुजविण्यास थोडा अवधी लागणार असून स्वच्छ आणि सकारात्मक विचाराने हे खड्डे निश्चित बुजविले जातील', अशी कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला मारली. उमरखेड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचा लेखाजोखाच मांडला.
अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र नजरधने, तर प्रमुख पाहुणे म्हणून कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी उपस्थित होते. 'पूर्वी २० टक्के लोक शहरात आणि ८० टक्के लोक गावात राहायचे. रोजगार, शिक्षण व अन्य कारणाने ग्रामीण जनतेचे लोंढे शहराकडे वळले. त्यामुळे आता हे प्रमाण ५०-५० टक्क्यांवर आले आहे. वाढत्या शहरीकरणाचे आव्हान स्वीकारून सांडपाणी घनकचरा, रोजागर, शिक्षण, आरोग्य, दळणवळण या सर्वच क्षेत्रात दर्जेदार सुविधा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कार्यक्रम तयार केला आहे', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.