डॉ. राजेंद्र गवई यांचे आंबेडकर, मायावतींना आवतन
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीसाठी प्रयत्न करत असले तरी, भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रिपब्लिकन पक्षासोबत येऊन आगामी निवडणूक लढवावी, असे आवतन रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी दिली. तसेच, अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणाही त्यांनी केली.
महाआघाडीसाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात भारिप-बहुजन महासंघ व बसपला सोबत घेण्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे. त्यासाठी राष्ट्रवादीनेदेखील सकारात्मक संकेत दिले असले तरी, आंबेडकर यांनी अद्याप कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही. उलट त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यात आता राजेंद्र गवई यांनी नवा पर्याय समोर केल्याने महाआघाडीसाठी काँग्रेसच्या प्रयत्नांना ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. गवई यांनी २००९ सालच्या निवडणुकीत रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. परंतु, त्याचा फारसा प्रभाव झाला नाही. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरू आहे.
आमची स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आहे. अमरावतीसह चंद्रपूर, जळगाव व मुंबईतील दोन जागांसाठी व्युहरचना आखण्यात येत आहे. आंबेडकर व मायावती यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी आमच्यासोबत आघाडी केल्यास आम्हाला अधिक आनंद होईल. त्यासाठी लवकरच उभय नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले. प्रा. जोगेंद्र कवाडे काँग्रेससोबत असल्याने ते येण्याची शक्यता नाही आणि कुठल्याही स्थितीत आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपला अमरावतीत लक्षणीय मते मिळाल्याकडे लक्ष वेधले असता, आता परिस्थिती बदलली आहे. गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या पक्षाला अधिक मते मिळाली. अर्थ सभापतिपद आम्हाला मिळाल्याचे राजेंद्र गवई म्हणाले.
.........