म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकरी उदध्वस्त झाला आहे. त्यांच्या शेतातील पिके गेली असून, शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यांच्यातील संताप, आक्रोश त्यांच्या देहातून दिसत असून, राजकीय मंडळींचे सांत्वन त्यांना वाचवू शकत नाही. त्यामुळे राज्याच्या राज्यपालांनी हस्तक्षेप करीत राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन मुव्हमेंटचे मुंबई प्रदेश अध्यक्ष बंटी उके यांनी दिले आहे.
खरीप हंगामातील कापूस, धान, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भूईमुग, कांदा, धान या प्रमुख पिकांसोबतच अन्य कडधान्यांचे तसेच बागायती पिके व फुलशेती, पालेभाज्या आदी उत्पादक शेतकऱ्यांचे पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मराठवाडा, खान्देश अशा राज्यातील सर्वच भागात परतीच्या पावसाने शेती नष्ट केली. हवालदिल झालेला शेतकरी राज्य सरकारकडे मोठ्या आशेने बघत आहे. मात्र, राज्यात सरकारच नसल्याने शेतकरी पुरता नागावून गेला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असून, त्यांचे कर्ज व विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी आता थेट राज्यपालांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्यपाल एकमात्र शेतकऱ्यांचे आशास्थान असल्याने रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे तातडीने मदत द्यावी, अशी विनंती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या डोळयांतील अश्रू पुसण्यासाठी तातडीने निर्णय न घेतल्या गेल्यास सरकारवरील विश्वास व घटनेतील आश्रयदात्यांवरील आपुलकी लयास जाईल, असे मतही मुव्हमेंटने व्यक्त केले आहे. मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहणे, प्रा. विनोद डोंगरे, बबन बोंदाटे, पृथ्वी गोटे, प्रमोद किटके आदींनीही निवेदनातून राज्यपालांना मदत करावी, अशी विनंती केली आहे.
....