म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्य शासनाने डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सुरू केलेला शिष्यवृत्ती अर्ज मागविण्याचा उपक्रम शिष्यवृत्ती बंद करण्याचे षडयंत्र आहे. याविरोधात लढा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी शुक्रवार, २६ जुलै रोजी रेशीमबागेतील कवीवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी १२ वाजता शिष्यवृत्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. युवाज संस्थेचे संयोजक अमन कांबळे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. शिष्यवृत्ती वितरणाचे सुलभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करीत राज्यात प्रथमच ही परिषद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर या परिषदेला मार्गदर्शन करतील. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी एकता मंचाचे सुनील पाल, समता सैनिक दलाच्या अॅड. स्मिता कांबळे, आदिवासी विद्यार्थी संघाचे शिवकुमार कोकोडे, मानवाधिकार संरक्षण मंचाचे आशिष फुलझेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुंडट फेडरेशनचे अतुल खोब्रागडे, कळमना वसतिगृह संघटनेचे विलास उईके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भरणे, विधी विभागाचे कैश तिरपुडे परिषदेत समस्या मांडतील. तांत्रिक तसेच अतांत्रिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना डीबीटी पोर्टलमुळे त्रास होत आहे. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती व परीक्षा शुल्काची रक्कम संस्थांच्या खात्यात जमा होत होती. सरकारने परीक्षा शुल्क त्वरीत शैक्षणिक संस्थांना द्यावे आणि शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँकेत जमा करावी. मात्र डीबीटी पोर्टलमार्फत ऑनलाइनसह थेट अर्ज स्वीकारण्याची सोय करावी, अशी मागणीही कांबळे यांनी केली. शिष्यवृत्ती परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रीतम बुलकुंडे यांनीं केले आहे.
डीबीटीविरोधात उद्या परिषद
मटा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2019, 4:00 am