म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
मकरसंक्रांतीनिमित्त बुधवारी नागपूरच्या आकाशात रंगीबेरंगी पतंग उत्सव पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.
मकरसंक्रातीला सारे आकाशच रंगबिरंगी ठिपक्यांनी रंगलेले असते. संक्रांत दरवर्षी साधारण १४ जानेवारीला असते. यंदा ती १५ जानेवारीला आली आहे. मकरसंक्रांतीला शनिवार किंवा रविवार आला की उत्साहाला उधाण असते. या वर्षी बुधवारी संक्रांत आहे. बहुतांश शाळांना सुटी असल्याने बच्चे कंपनी जोशात आहे, मोठ्यांना मात्र या आनंदोत्सवासाठी सुटी घ्यावी लागू शकते. अनेकांनी घराच्या गच्चांवर तयारी करून ठेवली आहे. डीजे आणि संगीताच्या तालावर 'ढील दे दे रे' असे म्हणत, प्रत्येकजण पतंग उडविण्याचा आनंद घेणार आहे. 'ओ काट...' असे सतत दिवसभर ऐकू येणार आहे. अनेक भागात 'ओ-काट' असे ओरडण्यासाठी माइकची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर पतंगांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत होती.
परंपरा प्राचीन
भारतात आणि विदेशात पतंग उडविण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. पतंगीचा जन्म चीनमध्ये झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याहीपूर्वी ग्रीकमध्ये पतंग उडविण्याचे दाखले आहेत. भारतात सिंधू संस्कृतीच्या काळात पतंगांची चित्रे आढळली आहेत. अमेरिका, जपान या देशांमध्ये दरवर्षी पतंग उडविण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. भारतात गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये विशिष्ट काळात पतंग उडविली जाते. अहमदाबाद संपूर्ण जगात पतंग उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येथे १९८९ पासून आंतरराष्ट्रीय पतंग उत्सव आयोजित केला जातो.
यंदा उत्साह कमी
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा पतंगीचा उत्साह तसा कमी दिसतो आहे. नायलॉन मांजावर आलेल्या संक्रांतीमुळे हा उत्साह कमी झाला आहे. पूर्वी पतंगीसाठी खास मांजा घरीच बनवला जायचा. काचेची भुकटी करून आठ-पंधरा दिवस आधीच वस्ती- वस्तीत मांजा घोटला जायचा. पण काही वर्षांपूर्वी नायलॉन मांजा बाजारात आणला आणि पारंपरिक मांजा जवळपास हद्दपार झाला. नायलॉन मांजा प्लॅस्टिकपासून तयार होत असल्याने तो लवकर तुटत नाही आणि कुजून नष्ट होत नाही. त्यामुळे तो पर्यावरणाला घातक आहेच. पण नायलॉन मांजामुळे आजवर अनेक पक्ष्यांसह माणसांचेही जीव गेले आहेत. त्यामुळे या मांजाविरोधात विविध सामाजिक संघटना जनजागृती मोहीम राबवित आहेत. नागपुरात किंग कोब्रा युथ ऑर्गनायजेशन गेल्या दहा वर्षांपासून या मांजावर बंदीसाठी लढा देत आहे. किंग कोब्रासहच अन्य संघटना, प्रसारमाध्यमे यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच पतंग उडविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे व उत्साहही कमी असल्याचे किंग कोब्राचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी यांनी सांगितले.
.......