-डॉ. राजकुमार यल्लावाड
मराठी कवितेत अगदी अलिकडच्या काळात नवीन पिढीतील काही कवी दमदार लेखन करीत आहेत. त्यांच्या प्रातिभाविष्कारातून अभिव्यक्त झालेला शब्दाविष्कार मराठी रसिकावर अधिराज्य गाजवत आहेत, अशा नवीन पिढीतील दमदार नाव म्हणजे नितीन देशमुख. आपल्या गझलांनी मराठी रसिकांना वेड लावणाऱ्या नितीन देशमुख यांचा 'बिकॉज... वसंत इज कमिंग सून' हा पुणे येथील अक्षरवाङ्मयने अलीकडेच प्रकाशित केलेला महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह. ४८ कविता आणि वैविध्यपूर्ण जाणिवेचा आविष्कार असलेला हा काव्यसंग्रह रसिकवाचकांच्या मनात कायमचे घर करून जातो. समाजजीवनाचे वास्तव रूप या काव्यसंग्रहात प्रतिबिंबित झाल्याचे बघवयास मिळते. हे कलात्म वास्तव श्रेष्ठ आहेच; पण, त्यापेक्षाही त्यातून गायलेली माणुसकीची भैरवी नितांतसुंदर आहे. माणुसकीचा वसंत बहार यावा, ही जाणीव उच्च पातळीवरची आहे.
मानवता हा माणसाचा मूलधर्म असला पाहिजे. त्याची पूजा हाच त्याच्या मनाचा स्थायीभाव असायला हवा; पण या व्यवस्थेत सोवळं-ओवळं, कर्मकांड, अस्पृश्यता, वांझोटे नियम, जीर्ण परंपरा यामुळे मानवता जर्जर झाली आहे. म्हणूनच 'माणुसकीचा शुक्राणू नपुंसक झालाय...', असं भाष्य नितीन देशमुख 'नग्न पिढ्यांचे वारसदार' या कवितेतून करतात. माणसातलं माणुसपण का हरवलं? येथील मूल्यव्यवस्था लयाला का गेली? माणसाला कोणी नागवलं? या सर्व प्रश्नांची उत्तरे अंतिमतः माणसांनीच मारलेल्या डंखात मिळतात. त्या डंखाचं विष सर्वत्र पसरले आहे. माणूस जाती-जातीत, धर्मा-धर्मात विभागला गेला. प्रत्येक धर्माने रंगाचीही विभागणी केली. रंगाची विभागणी करून कितीतरी टोळ्या या समाजव्यवस्थेत वावरत असतात, हे विदारक सत्य आहे. प्रत्येक टोळी दुसऱ्या टोळीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करते. आपला धर्म दुसऱ्या धर्मावर लादण्याचा प्रयत्न करते. याचे वास्तवचित्र कवी नितीन देशमुख यांच्या स्वप्नाची पार्श्वभूमी असलेल्या 'रंगीत पेशी' या कवितेत बघावयास मिळते...
काही दिवसांपूर्वी मला पडायचे एक... भयाण स्वप्नं
काही टोळ्या धरायच्या करकचून आणि म्हणायच्या...
आम्हाला टोचायच्या आहेत तुझ्या रक्तात रंगीत पेशी
एक टोळी म्हणायची, निळ्या पेशी
दुसरी म्हणायची हिरव्या...
तिसरी म्हणायची
नाही नाही असंभव
ह्याच्या रक्तात भगव्याच हव्यात पेशी...
समाजव्यवस्थेत हे विरूप चित्रं आजही बघावयास मिळते. संविधानामुळे मूल्यव्यवस्था टिकून आहे. संविधानाचे महत्त्व आपल्याला अधोरेखित करावेच लागेल. असे असले तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समता, स्वातंत्र्य, बंधुता ही लोकशाहीची मूलतत्त्वे आम्ही स्वीकारली असली, तरीही जाती-धर्माचे खूळ काही आमच्या डोक्यातून पूर्णपणे गेलेले नाही याचे प्रत्यंतर 'प्रतिज्ञा' या कवितेमध्ये येते. रंगविभागणी केली तशी आम्ही महामानवांचीही विभागणी केली. खरं तर समाजमन निकोप, निरोगी राहील. यादृष्टीने महामानवाचे काम अतुलनीय स्वरूपाचे..! स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणणारे मात्र या महामानवाचे विचार प्रत्यक्ष कृतीतून न आणता फक्त उक्तीपुरते सीमित ठेवतात. या वृत्तीवर कवी प्रहार करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महामानवांचे राष्ट्राच्या आणि समाजाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या विचारांची महती व त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही कवीने काव्यसंग्रहातून व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची नीती ही सर्वधर्म समभावाची, माणुसकीची, न्यायाची आणि स्वराज्य निष्ठेची होती. याबद्दल कवी नितीन देशमुख गौरवोद्गार काढतात...
तू दीपस्तंभ क्रांतीचा
तू वाघ खरा मातीचा...
समशेर तळपली गगनी
ही स्वतंत्र केली धरणी...
शब्दांना शक्ती नाही
दिव्यत्व तुझे गाया
जय जय शिवराया
जातियता, अंधश्रद्धा, द्वेष, मत्सर अशा विकृत जाणिवा समाजव्यवस्थेला रसातळाला घेऊन जात आहेत. त्या दोषांना दूर सारून माणूसपणाला आकार देऊ, हा संदेश कवी 'डोळसविज्ञान' या कवितेतून देतात. तर, अंधश्रद्धा हीसुद्धा 'छोटी मुक्ती' मिळविण्याच्या मोहापायी मानवता दूर सारते. आजही या देशात कितीतरी लोक अंगावर ऊन, वारा, पाऊस झेलत रस्त्याच्या कडेला भुकेल्यापोटी जीवन जगतात. त्यांचा विचार न करता अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आम्ही मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करतो. अगदी हीच जाणीव 'छोटी मुक्ती' या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे.
ऋतुनुरूप शुष्क पानगळीची परिस्थिती असली, तरी संघर्षाने परिवर्तन होणारच! आपल्या जीवनात वसंत येणारच... ही आशावादी जाणीव व्यक्त करताना कवी म्हणतात...
पानगळीच्या शुष्क कालावधीतही
वाळून चूर झालेल्या पानातील
जराशा हिरव्या भागानं... भांडावं
बेंबीच्या देठापासून... अख्ख्या ऋतुसोबत...
तसा असतो
जनसामान्यांचा संघर्ष
परंतु शिशिरानेही माजून जाऊ नये
कारण कधी ना कधी
संघर्षाला येतोच ना गुण
बिकॉज... वसंत इज कमिंग सून
कवी नितीन देशमुख यांच्या कवितेला असा घाट प्राप्त होतो. 'मानवतावाद' हा केंद्रबिंदू असलेल्या या काव्यसंग्रहात राजकारणी लोकांची प्रवृत्ती व त्यांचा उपहास, आयुष्यात आई इतकेच बापाचे असलेले महत्त्व, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचे शोकपूर्ण मनोगत, कृषी जीवनातील संकट, कृषिजीवनात असलेले बैलाचे महत्त्व, मातीचं गाणं, असे विविध विषय हाताळलेले आहेत. चिंतनात्मकता, वैचारिकता, प्रासादिकता आदी कवी नितीन देशमुख यांच्या लेखनाचे विशेष या काव्यसंग्रहात जाणवतात. अभंग, गझल, मुक्तछंद इ. काव्यप्रकारांच्या माध्यमातून आपल्या जाणिवांना मुक्तपणे वाट करून दिली आहे. त्यांच्या कवितेतून संगीत, चित्र या कलेतील प्रतिमा व प्रतीके सहजतेने डोकावतात.
'बॉर्डर', 'व्हायरस', 'सर्व्हिसिंग', 'इंजिन ऑइल', 'कार्बोरेटर', 'वॉशिंग', 'अलायन्मेंट', 'मॉडेल', 'रेडलाइट', 'बीकॉज', 'कॉलबॅक', 'ब्लॅकहोल', 'टेलिकास्ट' अशा इंग्रजी शब्दांसह 'पत्थर', 'आदमी', 'अच्छे', अशा हिंदी शब्दांचा वापर करून कवीने आपल्या कवितेचा आशय समृद्ध केला आहे. काही कवितेत वैदर्भी भाषेची बोलीरुपं आढळत असली तरी ती अभिव्यक्ती आशयाला पुरक अशीच असल्याचे ठसठशीतपणे जाणवते. या संपूर्ण कवितासंग्रहातील कविता रसिक मनाला भावणाऱ्या आहेत. कारण त्यातून प्रामुख्याने प्रतिकूल परिस्थिती दूर सारून अनुकूल वसंत आगमनाची आशावादी जाणीव व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह वाचनीय व सरस झाला आहे.
...
'बिकॉज... वसंत इज कमिंग सून'
(काव्यसंग्रह)
कवी : नितीन देशमुख
मुखपृष्ठं : विष्णु थोरे
प्रकाशन : अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे
पृष्ठं : ६४
किंमत : ८० रुपये.