म.टा. प्रतिनिधी, नागपूर,
नागपूर रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपूल न तोडता गणेशमंदिर व वाहतुकीसाठी नवीन रस्ता करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
शहराला स्मार्ट सुरू असलेली विकासकामे योग्य आहेत. २००८ साली तयार झालेला पूल शहराचा चेहरामोहरा बदलवताना तोडण्यात येऊ नये. त्यादृष्टीने पक्षाच्यावतीने गेल्यावर्षी काही सूचना सादर करण्यात आल्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी हा पूल तयार करण्यात आला. वाहनचालक, पादचारी आणि रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रस्ता व पुलाचे बांधकाम झाले. पुलाखाली १७५ दुकाने बांधण्यात आली. या दुकानदारांनी बँकेतून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. या परिसरातील व्यवसायावर हजारहून अधिक कुटुंब अवलंबून आहेत. गणेशमंदिरात जाण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळून नवीन रस्ता तयार करावा, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाशी आवश्यक पत्रव्यवहार करावा, मंदिरातील पार्किंग दुमजली करावी, रेल्वे स्थानकासमोरील सुरळीत वाहतूक, स्वच्छता व सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे महापालिका, पोलिस व दुकानदारांनी काटेकोर पालन करावे, स्थानकासमोरील रस्त्याची रुंदी वाढवून दुहेरी वाहतूक सुरू करावी, गरज पडल्यास शाळा, परिवहन महामंडळ व इतर जागा घेऊन त्यांना अन्यत्र जागा द्यावी, जयस्तंभ चौकातील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी स्थानकावर जाणारी थेट व्यवस्था करावी, रेल्वेस्थानकावरील पार्किंगसाठी तळमजला व दोन मजली इमारत बांधावी, आदी मागण्या 'आप'ने केल्या.
नागरिकांच्या करातून हा पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे पूल न तोडता पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. पूल तोडण्यास परवानगी देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा 'आप'चे डॉ. देवेंद्र वानखडे व अशोक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिली.