-डॉ. बळवंत भोयर
दादा अत्यंत जिगरबाज. जिंदादिल. कोणतेही काम ते राखून ठेवत नसत. दादा खऱ्या अर्थाने कलंदर व्यक्तिमत्त्व. दादा. कविश्रेष्ठ सुरेश भट. सांगायला हरकत नाही, बरेच मोठे कवी स्वत:च्या कवितांचा गुणगौरव करतात, वाचताना वा लिहिताना. दादा कधीच अवडंबर करायचे नाहीत. ते नेहमी म्हणायचे, ‘कविता माणसांची माणसासाठी आणि मानवीय मनांसाठी असायला हवी. शब्द शक्ती ही परिवर्तनाची
नांदी आहे.’
काव्यगायनात दादा माहोल बनवायचे. दादांची फारसी तसेच उर्दू भाषेवर कमांड होती. गझल लिहिताना शब्दसंग्रह, शब्दांचे चातुर्य, मांडणी, काफिया महत्त्वाचे ठरतात. दादा नेहमी काव्यवाचनापूर्वी यासंबंधीची गझल पाठशाळा घ्यायचे. ‘उर्दू भाषा अवगत करा, तरच गझल उत्तम लिहू शकाल. नाही तर शक्य नाही’, असे ते नेहमी म्हणायचे. गझल असो वा कविता, दादा ती तब्येतीने म्हणायचे. उर्दूची शेरोशायरी आरंभीला असायची. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘मला आधी मूड बनवावा लागतो.’
आनंदाचा आणि वेगळ्या अनुभूतीत रममाण होणारा प्रसंग एकदाचा आठवतो. त्यांच्याकडे म्हणजे ‘मैफिली’त (दादांचे घर) गेलो. दादा म्हणाले, ‘बळवंत चलतो का?’ मी म्हणालो, ‘हो चला’ अन् आम्ही निघालो, कार्यक्रमाकरिता. कार्यक्रम होता जीएस कॉलेजच्या बाजूला असलेल्या जवाहर वसतिगृहात. कविसंमेलन होते. माझ्याकडे तेव्हा स्कूटर होती. एफ-ई मॉडेलची. लांबसीट असलेली. दादांना म्हणालो, ‘दादा बसाना...’ ‘बसतो ना लेका’, त्यांचे उत्तर. मी गाडीवर बसलो आणि दादा मागे मात्र मला पाठमोरे बसले. माझ्या पाठीमागे नाही तर माझ्या पाठीला पाठ लावून. बैठकच मारली त्यांनी. मला हसू आलं. त्यांच्या हातात काठीही होती. मार्गात ओळखीचे बरेच लोक भेटले. ते म्हणायचे, ‘कवी चाललेत. कसे बसले ते बघा.’ मला मात्र दादा ‘मागे वळून पाहू नकोस’ असे बजावत होते. त्यांच्या अशा बसण्याचा खूप आनंद व्हायचा. त्यांना म्हणायचो, ‘दादा असं कसं बसणं?’ ते म्हणायचे, ‘ही माझी स्टाइल आहे.’ काव्यमैफिल आठवली की, दादांची ‘ती’
स्टाइल आठवते.
मला आठवतो, विदर्भ साहित्य संघातील राम गणेश गडकरी सभागृह आणि दीपक उदावंत यांच्या ‘सात गजा आत’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा. ते १९९२ वर्ष असेल. दादांच्या हस्ते सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन ठरले होते. वामनराव तेलंग यांची विशेष उपस्थिती होती. शिस्तीनुसार तेलंग वेळेत उपस्थित झाले होते. दादांचा पत्ता नव्हता. आमच्यासारख्या नवोदितांना दादांसारख्या ऊर्जेची फार गरज होती. संवेदनशील मनाचा ‘कोपरा’ घेऊन धंतोली येथील दादांचे घर गाठले. दरवाजा ठोठावला. दादांनी आतून आवाज दिला, ‘कोण आहे?’ मी म्हणालो, ‘दादा, मी बळवंत.’ ‘असं व्हय कां. येनं लेका आतमध्ये.’ ‘दादा आपल्याला कार्यक्रमाला जायचे आहे.’ ‘थांब ना लेका’ (अमरावती स्टाइलमध्ये) जाऊ नं. त्या दीपक्याले सांग येतोय म्हणून.’ थोड्यावेळाने दादा तयार झाले. म्हणाले, ‘बळवंता एक अट आहे.’ ‘कोणती?’ दादा म्हणाले, ‘आधी पोटोबा नंतर विठोबा.’ ‘कुठे दादा?’ ‘महाराष्ट्र हॉटेलमध्ये.’ ‘काय घ्यायचे?’ माझा प्रश्न. ‘ते सारं हॉटेलवाल्याला माहीत आहे तू त्याची काळजी करू नकोस...’ त्यांचे उत्तर. नाश्ता आटोपून आम्ही गडकरी दालनात प्रवेश केला तोच तेलंग पुढे आले आणि म्हणाले, ‘काय सुरेश एवढा उशीर...’ त्यावर दादा म्हणाले, ‘तुला तर माहीतच आहे वामन माझी स्टाइल!’
‘शब्द हे तलवारीसारखे धारदार असतात. ती धार अनुभवातून तीक्ष्ण होते’, असे मत व्यक्त केले होते दादांनी या प्रकाशनसोहळ्यात. चार दशके केवळ कविता आणि गझलेसाठी जगणारे आणि महाराष्ट्राच्या तमाम नवोदितांचे प्रेरणास्रोत दादा. रसिकांच्या मना-मनात कायमस्वरुपी बीजं निर्माण करणारे गझलसम्राट.