म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर
यंदाची पाणीटंचाई व पाणीकपात लक्षात घेता गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. शहरातील विविध भागांतील सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करण्यात आली असून या ठिकाणी पम्पही लावण्यात आले आहेत. स्वच्छ करण्यात आलेल्या या सार्वजनिक विहिरींचे पाणी विसर्जनासाठी वापरा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
गणेशोत्सवातील पीओपी मूर्तींमुळे पेयजलात बाधा निर्माण होते. आपल्या शहराचे वैभव असलेले तलाव या मूर्तींमुळे प्रदूषित होतात. जलचरांनाही त्याचा धोका निर्माण होतो. पीओपी मूर्तींबाबत उच्च न्यायालयाने गांभीर्य दर्शवित पीओपी मूर्तींच्या मागे लाल खूण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन व्हावे ,याची विशेष काळजी घेत आवश्यक तिथे कठोर कारवाई करा, असे सक्त निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेत व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांसह मंगळवारी मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, समितीच्या सदस्या विशाखा बांते, लीला हाथीबेड, रूपा रॉय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, राजू भिवगडे, हरीश राउत, प्रकाश वराडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, किंग कोबरा ऑर्गेनायजेशन यूथ फोर्सचे संस्थापक अरविंदकुमार रतुडी, वनराई फाउंडेशनचे बाबा देशपांडे, रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या डॉ. दीपा जमवाल, जोगी भासम, रोटरी क्लब ऑफ नागपूर मिहान टाउनचे पराग घुबडे, हिमांशू झाकर, जनजागृती आव्हान समितीचे प्रदीप हजारे, अनुज समुंद्रे, निसर्ग विज्ञानचे डॉ. विजय घुगे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना व संकल्पना मांडल्या. ग्रीन व्हिजिलतर्फे गणेशमूर्ती विसर्जनासाठी पिण्याचे पाणी न वापरण्याची मागणी करण्यात आली.
गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित होते. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून सुगंधी अगरबत्ती वा अन्य उपयोगी उत्पादने निर्माण करणाऱ्यांना निर्माल्य विनामूल्य देण्यात येत असल्याचेही महापौरांनी सांगितले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असून, यासाठी शहरातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, वाहतूक पोलिस आदींसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
पीओपीच्या गणेश मूर्ती नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जित होऊ नयेत, यासाठी शहरातील विविध भागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली जाते. यावर्षीही ती व्यवस्था करण्यात येणार असून, शहरातील प्रमुख ठिकाणांसह दहाही झोनमध्ये झोनस्तरावर वस्त्यांमध्येही विसर्जनासाठी कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात यावी. नागरिकांच्या सुविधांसाठी तसेच पर्यावरणपूरक गणोत्सवासाठी आवश्यक त्या ठिकाणी विसर्जन टँक वाढविण्यात यावे.
रबरी कृत्रिम टँक बाद
गणेश विसर्जनासाठी रबरी कृत्रिम टँकचा वापर करण्यात येतो. मात्र, या टँक खराब होत असल्याने दरवर्षी त्या नवीन खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे यावर्षीपासून रबरी कृत्रिम टँकचा वापर पूर्णत: बंद करून त्याऐवजी सेंट्रिंगच्या टँक तयार करून त्यामध्येच नागरिकांना मूर्ती विसर्जन करण्यास आवाहन करावे. यासोबतच विसर्जनस्थळी विद्युत व्यवस्था व स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. कृत्रिम टँकसाठी गतवर्षी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी)तर्फे निधी देण्यात आला होता. यावर्षीही वाढीव कृत्रिम टँकसाठी डीपीडीसीकडे मनपातर्फे मागणी करण्यात येणार आहे.
तलावातही विसर्जनास बंदी
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून शहराचे वैभव असलेले तलावांचे संवर्धन करणे हे मनपाचे कर्तव्य आहे. मात्र, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून शहरातील विविध स्वयंसेवी संस्था यासाठी कार्य करीत आहेत. मागील वर्षी सोनेगाव, गांधीसागर, सक्करदरा, अंबाझरी या महत्त्वांच्या तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला प्रतिबंध केला होते. यामध्ये यावर्षी नाईक तलावाची भर घालण्यात आली आहे. यावर्षी इतर तलावांसह नाईक तलावामध्येही कोणत्याही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
...............