म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची वाताहत झाली असून, यापुढील काळात आणखी भयावह स्थिती होईल, असा घणाघाती आरोप भाजपचे माजी खासदार व आता काँग्रेसचे नेते उदित राज यांनी केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते.
'भाजपविरोधी बोलल्यास सरकार त्यांच्यामागे ईडी आणि सीडीचा ससेमिरा लावतात. पी. चिदंबरम यांच्याविरोधात लेखी पुरावे नसतानाही त्यांना अटक करण्यात आली. लोकशाहीत बोलण्याचा अधिकार असताना विरोधी मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहेत. अनेक सरकारी उपक्रमांचे खासगीकरण करण्याचा सपाटा भाजप सरकारने लावला आहे. देशाला भारत, पाकिस्तान या विषयात अडकवून जनतेला भरकटविण्यात येत आहे. रेल्वेच्याही खासगीकरणाचा डाव आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गाला देशोधडीला लावून देश कसा महान बनणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी काँग्रेस प्रवक्ते संजय दुबे उपस्थित होते.
सावरकरांना भारतरत्न का?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात भाजपाच्या घोषणापत्रात उल्लेख आहे. त्यावर उदित राज यांनी आक्षेप घेतला. 'सावरकर यांनी अनेकदा इंग्रजांची माफी मागितली होती', याची आठवण त्यांनी करून दिली.