म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा
राजकारण हा आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. शेतकरी हित जोपासणे हेच आपले ध्येय आहे. त्यामुळे दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची ग्वाही महाआघाडीने दिली तरच आघाडीत सहभागी होण्याबाबत विचार करू अन्यथा स्वाभिमानी स्वबळावर लढण्यास सक्षम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवावी, असे आवाहन स्वाभिमानीचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी दिला.
बुलडाणा येथे आयोजित विदर्भ-मराठवाडा विस्तारित राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रांताध्यक्ष प्रकाश पोफळे, हंसराज वडगुले, सुबोध मोहिते, अमोल हिप्परगे, रसिका ढगे, माणिकराव कदम, राणा चंद्रशेखर चंदन यांच्यासह विदर्भ-मराठवाडयातील पदाधिकारी उपस्थित होते. खा. शेट्टी म्हणाले, अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता. त्याचप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या दिसतात. राजकारण हा आपला धंदा नाही. राजकारणासाठी कुणाच्याही मागे फरफटत जाण्याची भूमिका स्वाभिमानी कधीही स्वीकारणार नाही. त्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवून शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ असेही शेट्टी म्हणाले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही त्यांनी यावेळी धारेवर धरले होते. शेतकरी हितासाठी काम करण्याची तयारी ठेवा कोणतेही नियुक्त्या परस्पर करू नका, आपली संघटना राजकीय पक्ष नसून शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना असल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तर प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न डोळयासमोर ठेवा आणि त्यासाठी कोणत्याही यंत्रणेशी लढा देण्यासाठी तयार रहा असे आवाहन केले.