म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मेट्रोमधील अनियमिततांकडे लक्ष देण्यासोबतच मिहानसह शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
खासदार पटेल यांनी शनिवारी बजाजनगरातील 'जय जवान जय किसान'च्या कार्यालयाला भेट देऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. जनतेच्या पैशांतून मेट्रो उभारण्यात येत असल्याने या प्रकल्पातील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी 'जय जवान जय किसान'चे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी करून मिहानचा विकास झाला नसल्याकडे लक्ष वेधले.
गेल्या पाच वर्षांत मिहान प्रकल्पाचा अपेक्षित विकास झाला नाही. या प्रकल्पाला चालना मिळावे, उद्योग यावे, यासाठी सरकारदरबारी प्रयत्न करण्यात येतील. आघाडीच्या काळात मेट्रोसाठी प्रयत्न झाले पण, या प्रकल्पाला बळ मिळावे, असे कुठलेही धोरण आखण्यात आले नाही. आता याकडे अधिक लक्ष देण्यात येईल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. यावेळी माजी आमदार राजू जैन, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, महापालिकेतील पक्षनेते दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जावेद हबीब, अविनाश गोतमारे, सतीश इटकेलवार, रवी इटकेलवार, अरुण वनकर, नूतन रेवतकर, अलका कांबळे, आसिफ कुरेशी आदी उपस्थित होते.
फी वाढीबाबत चर्चा
जागरुक पालक समितीच्या एका शिष्टमंडळाने शैक्षणिक संस्थांच्या फी वाढीला विरोध करणारे निवेदन खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिले. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.