विद्यापीठाची 'गुड न्यूज'
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या शेतकऱ्यांच्या मुलांचे उन्हाळी २०२०मधील होणाऱ्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात गुरुवारी राज्य सरकारचा अध्यादेशदेखील काढण्यात आला.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा महापूर व अतिवृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातदेखील पुराचे तडाखे बसले होते. तर खरीप पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा व इतर शुल्क जमा करणे कठीण होत आहे. त्यामुळे मराठवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यात सर्वप्रथम आपादग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षाशुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेदेखील त्याचप्रकारचा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे ओला दुष्काळ अद्याप जाहीर झालेला नाही. त्यास्थितीत सरकारच्या निर्णयाची अथवा आदेशाची प्रतीक्षा न करता विद्यापीठांनी शुल्कमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूर विद्यापीठानेदेखील भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे शुल्क माफ करावे, असा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत सादर केला. त्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
प्र-कुलगरूंच्या अध्यक्षतेखाली समिती
नागपूर विद्यापीठाने यापूर्वी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना तसेच माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या पाल्यांनाही परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्याच समितीकडे आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.