कृषितज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
'जमिनीवर उगवणारे कोणतेही पीक मुळांच्या पोषणातून वाढत आहे. पिकांना अन्नघटक पुरविण्याचे काम ही मुळे करतात. त्यांना लागणारे अन्न हे शेतीतले जिवाणू तयार करतात. रासायनिक खतांच्या वापरामुळे तयार होणाऱ्या कॅडमियम, आर्सेनिक, पारा, शिसा यांसारखे जहाल रासायनिक घटक याच जिवाणूंना मारतात. त्यामुळे पिकांचे कुपोषण होऊन ते रोगराईला बळी पडतात. सेंद्रिय शेतीमुळेदेखील हे घडते. त्यामुळे देशी गायीचे शेण हेच नैसर्गिक शेतीतून तयार होणारे जिवाणूंच्या विरजणाचे काम करते. तेच पिकांना पोषक असते', असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ आणि पद्मश्रीने सन्मानित डॉ. सुभाष पाळेकर यांनी येथे नोंदविले.
निमित्त होते, नागपूर नॅचरल्सच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात 'चले प्राकृतिक जीवन की और' या उपक्रमांतर्गत आयोजित 'घरच्या शेतीवर झीरो बजेट आध्यात्मिक शेती' या आगळ्यावेगळ्या विषयावरील कार्यशाळेचे. एक हजार चौरस फुटांवर चार माणसांच्या कुटुंबाला पुरेल, इतका भाजीपाला नैसर्गिकरित्या छतावरच पिकविता येणे शक्य असल्याचे नमूद करीत डॉ. पाळेकर म्हणाले, 'एक हजार चौरस फूट जागा दिवसातून साडेबारा किलो कॅलरी सौरऊर्जा देते. यातून रोज दीड किलो अन्नधान्य आणि सव्वादोन किलो फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ शकते. पालेभाज्यांपासून ते फळभाज्या आणि फळांसह वेलीवर येणाऱ्या भाज्यांचेही उत्पादन घेणे शक्य आहे. सध्या कारखाने, प्रकल्पांसाठी शेतजमिनीची होणारी नासाडी आणि रासायनिक खतांमुळे घसरणारा जमिनीचा पोत पाहता भविष्यात टेरेस गार्डन वा छतावरील शेती हाच पर्याय राहणार आहे. नैसर्गिक खतांमुळे सुपीक जमीन वांझ होत आहे. त्यामुळे रोज सामान्यांच्या ताटात येणाऱ्या भाज्यांपासून ते अन्नधान्यापर्यंत सगळेच विषयुक्त आहे. या विषयुक्त खाद्यपदार्थांमुळे पिढ्यांमधील रोगप्रतिकारशक्ती नष्ट होऊन शरीर आजारांना, रोगांना बळी पडत आहे. या पिढ्या जगवायच्या असतील तर रसायनांमुळे मरणयातना भोगत असलेल्या शेतजमिनीला आधी वाचविले पाहिजे. खते, रासायनिक घटक असलेल्या फवारण्या शेती उद्ध्वस्त करणाऱ्या किटकांना मारतात, हा दावाच मुळात खोटा आहे. जमीन ही अन्नद्रव्यांनी समृद्ध आहे. जमिनीतले अनंतकोटी जीवाणू या घटकांचे पोषण करतात. मुळांमार्फत हे अन्नघटक पिकांना जातात. रसायनांमुळे तेच नष्ट होतात आणि रासायनिक पदार्थ अन्नाद्वारे पोटात जातात. त्यामुळे ताटातले अन्न विषयुक्त आहे.'
गायीचे महत्त्व मोठे!
गोठ्यात बांधलेली एक देशी गाय ३० एकर शेतीला शेण पुरवू शकते. देशी गायीच्या शेणात जमिनीतल्या जिवाणूंना पोषक खाद्य असते. एकरी दहा किलो शेण महिन्यातून एकदा शेतीला दिल्यास पिकांची नैसर्गिक वाढ करणे शक्य आहे, असेही डॉ. सुभाष पाळेकर यांनी यावेळी नमूद केले.