सुरक्षेच्या कारणाने मार्ग बंद; एकाच बाजूने प्रवेश
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
रेल्वेस्थानकावर प्रवेशासाठीचे काही मार्ग बंद केल्याने आता पश्चिमेकडे एकमेव मार्गातून प्रवाशांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी चेंगराचेंगरीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
देशात अनेक ठिकाणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्या-त्या ठिकाणी काही उपाययोजनाही करण्यात आल्या. मात्र, संवेदनशील असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने लोहमार्ग ठाण्याजवळील प्रवेशद्वार अलीकडेच बंद करण्यात आले. आता केवळ एकच म्हणजे मुख्य प्रवेशद्वार सुरू आहे. सायंकाळच्या वेळी प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. फलाटावर प्रवाशांची चांगलीच गर्दी असते. शिवाय, आता सुरू असलेल्या प्रवेशद्वाराची रुंदीही कमीच आहे. अशावेळी कधी चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी पश्चिम प्रवेशद्वाराकडील आधी व्हीआयपी आणि नंतर लोहमार्ग ठाण्याजवळील प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यानंतर आरपीएफ ठाण्याच्या बाजूने असलेले प्रवेशद्वारही बंद करण्यात आले. या स्थानकावर रोज ३० ते ३५ हजार प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे स्थानकावर नेहमीच गर्दी असते. त्यातच रेल्वे कर्मचारी, पार्सल कर्मचारी, कुली आणि आरएमएचे कर्मचारी यांना ट्रॉलीवर साहित्य घेऊन जाणेही शक्य होत नाही. या गर्दीतच बॅटरी कारही धावते.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्थानकाच्या आत जाण्यासाठी आणि स्थानकातून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे आहेत. आत जाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ बॅगेज स्कॅनर आहे. या प्रवेशद्वाराची रुंदी फारच कमी आहे. त्यातच बॅग स्कॅनर असल्याने हा मार्ग आणखीच कमी पडतो. प्रवाशांची संख्या आणि सर्व प्रवेशद्वार बंद केल्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराचे मार्ग तोकडे पडतात. या प्रवेशद्वाराची रुंदी मोठी असती तर प्रवाशांना सोयीचे झाले असते. विशेष म्हणजे, लोहमार्ग ठाण्याजवळील जे प्रवेशद्वार बंद करण्यात आले, त्या प्रवेशद्वाराजवळ तिकीट तपासणीस नेहमीच असायचे. तरीही ते प्रवेशद्वार बंद करण्यात आले. व्हीआयपींसाठी पश्चिम दिशेला एक प्रवेशद्वार आहे. गेल्या काही वर्षांपासून तेही बंद करण्यात आले.
नाराजीचा सूर
नागपूर विभागात बरीच छोटी स्थानके आहेत. त्यामुळे त्या स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमीच असते. अशाठिकाणी एका प्रवेशद्वाराने काम चालू शकते. मात्र, ज्या स्थानकावर दररोज दीडशेपेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात, दररोज ३० ते ३५ हजार प्रवासी ये-जा करतात, अशा ठिकाणी एक प्रवेशद्वार पुरेसे नाही, असा सूर उमटत आहे.