ताराबाई शिंदे साहित्य नगरी (बुलडाणा) :
समतावादी किंवा स्त्रीमुक्तीच्यादृष्टीने १९व्या शतकात बुलडाण्याच्या ताराबार्इं शिंदे यांनी ठणकावून प्रश्न विचारण्याची हिंमत साहित्यातून दाखविली. याच जिल्ह्यात जन्मलेल्या जिजाऊंनी शिवरायांना स्त्री आदराची शिकवण दिली. पण आज आपण आपल्या मुलांना ते शिकवतो का? याची जाण स्त्रीयांमध्ये निर्माण करण्याची खरी गरज आहे. स्त्रीवादी म्हटले की खूप गैरसमज आणि त्यादृष्टीने कपोलक्लपित प्रतीमा तयार करण्यात आल्या आहेत. मात्र स्त्रीवाद म्हणजे खऱ्याअर्थाने महिलांना त्यांच्या शोषणाची जाणीव करुन देत भगिनीभाव जागृत करुन देणे आहे, असे प्रतिपादन कवयित्री नीरजा यांनी केले.
महाराष्टÑ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमाने रविवारी, २५ ऑगस्ट रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पार पडले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून कवयित्री नीरजा बोलत होत्या. संमेलनाच्या उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दा भोळकर तर स्वागताध्यक्षा डॉ. प्रभा चिंचोले या होत्या. प्रमुख अतिथी
म्हणून नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद, प्रगती वाचनालयाच्या अध्यक्षा अरुणा कुल्ली, वरिष्ठ पत्रकार ज्योती आंबेकर, दिशा पिंकी शेख उपस्थित होत्या.
पुढे बोलताना नीरजा म्हणाल्या, स्त्रीयांवर अनेक परंपरा लादण्यात आल्या आहेत. यात व्रतवैकल्य यांचा मोठा मारा आहे. घरासाठी, नवऱ्यासाठी, कुटुंबासाठी व्रते असताना स्त्रीयांच्या स्वत:साठी ती आहेत का हाही तार्किक विचार आवश्यक आहे. वटपौर्णिमेला वडाला पुजण्यापेक्षा वडाच झाड लावण्याचा विचार समोर यायला हवा. पुरुषसत्ताक पध्दतीत मर्दपणाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. मग त्याच्या मोठेपणामध्ये त्यांची व्यसन दुर्लक्षित ठरतात. महिलांसदर्भात साहित्यातून आवाज उठवणाऱ्यांना स्त्रीवादी लेखिका म्हटल्या जाते. मात्र त्या खूप आक्रमक,धाडसी, कुटुंब संस्कार मोडणाऱ्या असतात असे खूप गैरसमज समाज जीवनात आढळतात. गुलामाला गुलामीची जाणीव करुन द्यावी लागते. यासाठी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लेखिका मॉरेसनच उदाहरण देत महिलांना त्यांच्या शोषणाची जाणीव करुन द्यावी लागेल. यासाठी स्त्रीवाद आवश्यक आहे. स्त्रीवाद शोषणाविषयी जागृती करतो. महिलांच अ भिव्यक्त होणे म्हणजे स्त्रीवाद पण स्त्रीमुक्ती आपल्याला कळली आहे का,त्यासाठी संवादाचा सेतू उ भा करावा लागेल. नवी रुपक शोधावी लागतील. आजची माध्यम आपल्याला पाहायला आणि ऐकायला लावतात. पण आपण वाचायला लागले पाहिजे, असे आवाहन त्यांनी महिलांना केले. महिलांनी स्वत:ची स्वप्न मनापासून जगण्याचा मार्ग आत्म भान जागवत जगला पाहिजे. आपल्यातील बाई शोधन म्हणजे सत्व शोधन आहे. यासाठी लिहित्या, वाचत्या आणि विचारकर्त्या व्हा, असे सांगत 'बाई जुना सूर्य निपचित पडला आहे सरणावर, आता तुच हो नव्या जगातला नवा सूर्य' अशा काव्य ओळी म्हणत जागे होण्याचे आवाहन नीरजा यांनी केले.
महिलांनी ओळखावे अ भिव्यक्तीचे मोल : मुक्ता दाभोळकर
महिलांच्या आयुष्याला बदलत्या जगात नवे आयाम प्राप्त झाले पाहिजे. यासाठी साहित्य संमेलनामधून उभारी मिळायला हवी. महिला लिहित्या झाल्या पाहिजे. अ भिव्यक्तीला, मतांना किंमत मिळाल्यावरच सकस साहित्य निर्माण होईल. यासाठी महिला साहित्यिकांना व्यवस्थेमध्ये पैसा मिळायला हवा. महिलांना ती स्त्री म्हणून कशी घडवली गेलीय याची जाण स्वत: करुन घ्यावी लागेल. यासाठी प्रश्न विचारणारा किडा बाईच्या डोक्यात कायम वळवळत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन करत महिलांनी स्वत:च्या अ भिव्यक्तीचे मोल ओळखावे, असे उद्घाटक मुक्ता दाभोळकर म्हणाल्या. कसदार स्त्री साहित्य निर्माण करण्यासाठी प्रश्न निर्माण करण्याचे धाडस महिलांमध्ये आले पाहिजे. साहित्याच्या साचलेपणाची कोंडी फोडायला हवी, तरच स्त्रीया चांगले साहित्य निर्माण करु शकतात, असेही त्या म्हणाल्या.
दाभोळकर पुढे म्हणाल्या की, अलिकडे बचतगटामुळे महिलांची पत वाढली मात्र कष्ट दुप्पट झाले. त्यांच्याकडेही व्यक्त होण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहे. कायद्यामुळे बायका गावच्या कारभारणी झाल्या. पण त्यातील किती बायका लिहित्या झाल्या असा प्रश्न त्यांनी विचारला. बाईच्या आयुष्याला बदलत्या जगात नवे आयाम प्राप्त झाले पाहिजे. साहित्याबद्दल बोलताना अ भिव्यक्ती ही येतेच. समाज माध्यमांचा उद्रेक कहर करत असताना प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला वाव मिळायला हवा. ग्रामीण भागामध्ये दहावीपर्यंत शिकलेल्या अनेक महिला आहे. त्यांच्या साहित्यिक जाणीवा प्रगल्भ कराव्या लागतील, असे त्या म्हणाल्या.
नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद यांनी स्त्री भृणहत्या, हुंडापध्दती, स्त्रीयांवरील अत्याचार यासाठी साहित्यातून जागृती होण्यासाठी संमेलनाची आवश्यकता विषद केली. प्रास्ताविक अरुणा कुल्ली यांनी केले. स्वागताध्यक्षा प्रभा चिंचोले यांनी बुलडाण्याच्या साहित्य परंपरेचा आढावा घेत महिला विश्व सुधारण्यासाठी अंधश्रद्धा, व्यसनमुक्तीवर काम करण्याची तयारी समाजाने ठेवावी, असे सांगितले. संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे संचालन अंजली परांजपे यांनी केले तर आभार डॉ. विजया काकडे यांनी मानले. दरम्यान प्रयोगशील ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांचे 'प्रश्न आणि प्रश्न चिन्ह' या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुष्पा कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. सुरुवातीला निष्पर्ण वृक्षाला प्रतिकात्मक रुपात पाने लावून आणि संविधान उद्देशिकेला अभिवादन करुन उद्घाटन करण्यात आले.
चौकट
पुरुषांनी केले मान्यवर महिलांचे औक्षण
राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने छोटासा परंतु परंपरागत व्यवस्थेतला बदल घडवून आणत आयोजकांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. मान्यवर महिला साहित्यिकांचे पुरुषांनी कुंकूम तिलक लावून औक्षण करीत नवा पायंडा पाडला. यासह निष्पर्ण झाडाला रुपकात्मक स्वरुपात पान बांधण्याचा संदर्भ संमेलनाध्यक्ष नीरजा यांनी भाषणामध्येही घेत पर्यावरण आणि बाईच्या जगण्याची सांगड घातली. पृथ्वीची अवस्था ओसाड झाली आहे. प्रत्येकाने पर्यावरणाला ओरबडून घेतले आहे. बाईच जगणही वर्षानुवर्ष शोषणात गेले. परंतु पर्यावरण अन् आपले जगणं बदलू शकत याचे रुपकात्मक का होईना चित्र निष्पर्ण झाडातून उ भे राहिल्याचे नीरजा म्हणाल्या.
------------------------------------