म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदाकरिता गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले महाभारत अखेर संपुष्टात आले. या पदाकरिता निवड समितीने प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांची निवड केली होती. परंतु, काही कायदेशीर बाबी आड आल्याने खटी यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आता कुलसचिवपदाकरिता नव्याने निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या कुलसचिवपदाकरिता २३ जणांमध्ये लढत झाली होती. निवड समितीने प्रभारी कुलसचिव व एलआयटीतील प्राध्यापक डॉ. नीरज खटी यांच्या निवडीची शिफारस केली. साधारणपणे निवड समितीकडून तीन नावांची शिफारस केली जाते. त्यातील पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला नियुक्ती पत्र देण्यात येते, त्या उमेदवाराने पद स्वीकारण्यास नकार दिल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला संधी देण्यात येते. परंतु, कुलसचिवपदासारख्या महत्त्वाच्या पदासाठी निवड समितीने केवळ एकाच नावाची शिफारस कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना केली. त्यामुळे डॉ. खटी यांना नियुक्तीपत्र देणे कुलगुरूंना भाग पडले.
दरम्यान, डॉ. खटी हे एलआयटीत प्राध्यापकपदावर काही महिन्यांपूर्वीच रूजू झाले आहेत. तसेच त्यांचा दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी आहे. त्यामुळे त्यांना कुलसचिवपद स्वीकारण्यासाठी एलआयटीतून लीन घेणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी कुलगुरू डॉ. काणे यांच्याकडे अर्ज केला. परंतु, डॉ. खटी यांचे वेतनश्रेणीदेखील कायम राखण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा कुलगुरू डॉ. काणे यांनी डॉ. खटी यांना लीन देण्यास नकार दिला. त्यामुळे खटी यांना कुलसचिवपद स्वीकारण्यास असमर्थता व्यक्त केली. परिणामी आता त्या पदाकरिता नव्याने निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे.
परीक्षा संचालकपदाकरिता दहा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यात विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. प्रफुल्ल साबळे यांची निवड करण्यात आली. डॉ. साबळे हे परीक्षा नियंत्रकपदावर रूजू झाले. दरम्यान, या पदाकरिता झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीत कुलपती नामित सदस्य डॉ. मिलिंद बारहाते यांनी त्यांची हरकत नोंदवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉ. बारहाते यांनी उपकुलसचिव अनिल हिरेखण यांना नियुक्त करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, निवड समितीने डॉ. साबळे यांना प्रथम क्रमांकावर ठेवले, त्यावर डॉ. बारहाते यांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे विद्यापीठातील दोन्ही नियुक्ती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्या आहेत.
...तर खटींची निवड केलीच कशी?
कुलसचिवपदासाठी सुमारे वर्षभरानंतर निवड प्रक्रिया करण्यात आली. कुलगुरू डॉ. काणे यांनी डॉ. नीरज खटी यांची निवड करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यामुळेच निवड समितीनेदेखील डॉ. खटी यांच्याच नावाची शिफारस केली. परंतु, त्यानंतर विद्यापीठातील राजकीय वातावरण तापले. कुलगुरूंना अशाप्रकारे डॉ. खटी यांच्या नावाचा आग्रह न करण्याची समजही देण्यात आली. परिणामी नियमांचा आधार घेत डॉ. खटी यांना पद न स्वीकारण्यास बाध्य करण्यात आले. डॉ. खटी यांना एलआयटीत नियुक्त करणारे कुलगुरू डॉ. काणेच होते, त्यांनीच खटी यांना प्रभारी कुलसचिव केले, त्यांनीच नियमित कुलसचिव पदही बहाल केले, तर कुलगुरूंनीच डॉ. खटी यांच्या लीनला नाकारून खटी यांनी पद न स्वीकारण्याची परिस्थिती निर्माण केली. इतके सगळे निर्णय एकाच व्यक्तीसाठी घेण्यात आलेत, तेव्हा डॉ. खटी यांची निवड केलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.