म.टा. प्रतिनिधी, नागपूर
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वाचविण्यात मोलाची भूमिका बजावणारे उमरेडचे माजी आमदार वसंतराव इटकेलवार यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र विनोद व संदीप, चार कन्या आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ. श्रावण पराते यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, उमरेडचे आमदार सुधीर पारवे, माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आशिष जयस्वाल, जय जवान-जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, नगरसेवक दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ काम केल्यावरही वसंतराव इटकेलवार यांना पक्षाने विधानसभेसाठी कधी संधी दिली नाही. तीन वेळा त्यांनी अपक्ष म्हणून भाग्य आजमावले. अखेर त्यांनी १९९९ साली मतदारांना भावनिक आवाहन केले. यात ते अपक्ष म्हणून यशस्वी झाले. तत्कालीन विलासराव देशमुख सरकारला पाठिंबा दिला असता आघाडी सरकारला वाचवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. श्रीमंत कुटुंबातील असतानाही इटकेलवार यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय राहिले. गरीब, सर्वसामान्यांसोबत राहणे, बस प्रवास आणि पत्र लिहिणे हा त्यांचा आवडता छंद होता. स्पष्टवक्ते आणि मनमिळावू हे त्यांचे खास वैशिष्ट्य. चारचौघांबोत बसले की त्यांच्या गप्पा रंगायच्या. आपला साधेपणाचा वसा त्यांनी अखेरपर्यंत जोपासला.