नागपूर : विनापरवाना नागपुरात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या बांगलादेशच्या चार भिक्खूंना विशेष शाखा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चौघेही सुरेंद्रगड भागात भाड्याने राहात होते. रॉकी विमल बरुवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६), सुदर्शन नयन बरुवा ऊर्फ नयन सुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०), विप्लब शिषिर बरुवा ऊर्फ तालुकदार (वय ३४) व प्रदीप चित्तरंजन बरुवा ऊर्फ नंदन तपन बरुवा (वय २८, सर्व रा. बांगलादेश) अशी अटकेतील बांगलादेशींची नावे आहेत. सुरेंद्रगडमधील गांधी पुतळ्याजवळ चारजण संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती विशेष शाखा पोलिसांना मिळाली. पोलिस उपायुक्त निर्मला देवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार, पोलिस निरीक्षक किशोर नगराळे, सहायक निरीक्षक ए. एस. फर्नांडिस, ज्ञानेश्वर उराडे, हेडकॉन्स्टेबल श्याम कुलमते, हरिदास, दुर्याधन , रमेश, रविशंकर, सलीम, सुनिता, ज्ञानेश्वर भोगे, कमलाकर भंगाळे, रत्नमाला यांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ते पासपोर्ट व व्हिसा नसतानाही नागपुरात राहात असल्याचे समोर आले. रॉकी हा दहा वर्षांपूर्वी नागपुरात आला. त्यानंतर त्याने अन्य तिघांना नागपुरात आणल्याचेही समोर आले. चौघांना गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
चार बांगलादेशी भिक्खूंना अटक
विनापरवाना नागपुरात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या बांगलादेशच्या चार भिक्खूंना विशेष शाखा पोलिसांनी सापळा रचून अटक केली...
Maharashtra Times 26 Aug 2018, 4:00 am