म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
न्यायदान हे पवित्र कार्य असून ते प्रमाणिक, निष्ठापूर्वक व पारदर्शकता ठेवून करणे हे अपले कर्तव्य आहे. तेव्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व वकीलांनी न्यायदानाच्या माध्यमाने देशसेवेसाठी तत्पर व्हावे, असे आवाहन मुंबई हायकोर्टातील निवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, नागपूर जिल्हा वकील संघ आणि इंडियन अॅडव्होकेट मल्टीस्टेट व मल्टीपरपज को ऑपरेटीव्ह सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायदंडाधकी प्रथम वर्ग मुख्य परीक्षेत पास झालेल्या वकीलांसाठी प्रारूप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मुलाखती न्या. आर. सी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. त्याप्रसंगी भावी न्यायाधीशांना मार्गदर्शन करताना न्या. चव्हाण बोलत होते.
न्यायपालिकेच्या पहिल्या पायरीवर न्यायदंडाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न्यायदानाची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना न्याय मिळाला, ही भावना न्यायपालिकेच्या पहिल्याच पायरीवर निर्माण झाली तर पुढील न्यायालयीन प्रकरणे टाळली जातात. तेव्हा न्यायाधीशांनी कर्तव्यभावनेने कार्य करणे आवश्यक आहे, असे न्या. चव्हाण म्हणाले. कार्यक्रमाला बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अॅड. जयंत जयभावे, सदस्य अॅड. अनिल गोवारदीपे, नागपूर जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. नितीन देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. जयंत जयभावे यांनी केले. या उपक्रमात नागपूर विभागातील २३ वकीलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शास्त्री यांनी केले. नितीन देशमुख यांनी आभार मानले.