नागपूर : पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा, खाते बंद करण्यासारखे प्रकार सरकारकडून सुरू असतानाही शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ सुरू आहे. यावरून राष्ट्रीयीकृत बँकांवर सरकार, प्रशासनाचा वचक नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. पेरणी सुरू झाल्यानंतरदेखील बँकांकडून कर्ज मिळालेले नाही. आधीच चार वर्षांपासून नापिकी तर कधी चांगले पीक आल्यानंतरही कमी भावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या हंगामात बोंड अळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. सरकारने तूर व हरबरा खरेदी केला. आणखी शेतकऱ्यांकडे तूर व हरबरा पडून आहे. सरकारने खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे दिले नाही. ही स्थिती असताना बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे जावे, असा सवाल देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही आणि काही शाखांमधून देताना वेठीस धरण्यात येत आहे. राज्यकर्त्यांकडून गुन्हे दाखल करून सरकारचे खाते बंद करण्याचा इशारा देण्यात येत असला तरी, बँकांनी कर्ज दिलेले नाही. नीरव मोदी, विजय मल्ल्यासारखे उद्योगपती कोट्यवधी रुपये घेऊन विदेशात पळून गेले. यानंतरही उद्योगपतींसाठी पायघड्या घालण्यात येतात. सरकारने तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि फक्त इशारा देण्याऐवजी बँकांवर प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
सरकारचा बँकांवर वचक नाही : देशमुख
पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा, खाते बंद करण्यासारखे प्रकार सरकारकडून सुरू असतानाही शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ सुरू आहे.
Maharashtra Times 24 Jun 2018, 7:28 am