म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर,
कर्तव्यावर असताना रेल्वे कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना २४ तासांच्या आत आर्थिक लाभाची जवळपास १६ लाख रुपयांची रक्कम देऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आदर्श घालून दिला.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मरमाझरी येथे रामकरण अंछाराम हे पॉइंट्समन म्हणून कार्यरत होते. ११ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी ते मरमाझरी रेल्वे स्थानकाजवळ रुळावर काम करीत असतानाच धडधडत आलेल्या एका रेल्वे गाडीने त्यांना धडक दिली. यात अंछाराम यांचे शीर धडावेगळे झाले. या प्रकारामुळे खळबळ उडाली. लगेच रेल्वे नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. या घटनेनबात कळताच मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोमेशकुमार यांनी तातडीने एक उच्चाधिकार समिती गठीत केली व मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने सर्व आवश्यक आर्थिक लाभ देण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानुसार कार्मिक तसेच लेखा विभागाने अंछाराम यांना देय असलेल्या रकमेचा प्रस्ताव तयार केला व २४ तासांच्या आत मृत अंछाराम यांच्या पत्नीला १५ लाख ८६ हजार ८१२ रुपयांचा धनादेश प्रदान केला. एखाद्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना अशा प्रकारे २४ तासांत सर्व आर्थिक लाभ मिळण्याचे भारतीय रेल्वेतील हे अनोखे उदाहरण आहे.
सोमेशकुमार यांनी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्मिक अधिकारी गोरक्ष जगताप, अतिरिक्त विभागीय वाहतूक व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, अतिरिक्त विभागीय वित्त व्यवस्थापक विजय कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ तासांत आर्थिक मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले.
.....