म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
अपघात झाल्यास १०८ या टोल-फ्री हेल्पलाइनवर कळविल्यास रुग्णवाहिका येते. अपघातग्रस्ताला वेळीच मदत मिळाल्यास जीव वाचतो. त्यामुळे या टोल-फ्री क्रमांकाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार व्हावा. मात्र, हे स्टिकर ऑटोरिक्षावर लावण्यासाठी आरटीओ कार्यालयात ५० रुपये घेतले जातात. ते नि:शुल्क लावण्यात यावे, अशी मागणी रेल्वे स्थानकावरील लोकसेवा प्रीपेड ऑटो चालक-मालक संघटनेतर्फे करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अन्सारी यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानक परिसरात ऑटोचालक एकत्रित आले आणि शुल्क घेत असल्याचा निषेध केला. रेल्वे स्थानक परिसरात प्रीपेड ऑटो बुथ आहे. या बुथच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली जाते. सध्याच सर्वच वाहनांवर 'अपघात झाल्यास १०८ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा', असा मजकूर लावलेले स्टिकर लावलेले आढळते. ऑटोचालकांनाही असे स्टिकर लावणे बंधनकारक केले आहे. ऑटो पासिंगसाठी आरटीओ कार्यालयात नेला, की आधी ऑटोमागे हे स्टिकर लावले की नाही हे पाहिले जाते आणि मगच पासिंगची प्रक्रिया सुरू होते. स्टिकर लावायला हरकत नाही, मात्र त्यासाठी ५० रुपये कशाला असा अन्सारी यांचा सवाल आहे. ते म्हणाले की, हे स्टिकर नि:शुल्क लावण्यात यावे आणि पैसे घ्याचेच तर ५० रुपये कशाला? कारण हे स्टिकर फार तर ५-७ रुपयात तयार होतात मग कधी ५० रुपये तर कोणाकडून १०० रुपये कशाचे आकारण्यात येतात. त्यामुळे हा प्रकार बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत लवकरच गिरीपेठ आणि पूर्व नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे अंसारी यांनी मटाला सांगितले. यावेळी इसाक अहमद, श्याम धमगाये, शेख शहजाद, प्रदीप पाटील, चाँद खान, केजुराम साहू उपस्थित होते.