lalit.patki@timesgroup.com
Tweet@lalitpatkiMT
क्रिकेट असो की हॉकी, वा असो कुस्ती; भारत आणि पाकिस्तान परस्परांसमोर उभे ठाकले की सामना 'हॉट' होतोच. या परंपरागत प्रतिस्पर्धींमध्ये मग विजय कुणाचा होतो, याकडे जगभराची नजर असते, हे वेगळे सांगायची गरज नाही. यावेळीही उभय देशांमध्ये एक हटके सामना रंगलाय. खासीयत अशी की, यावेळचा सामना खऱ्या अर्थाने 'हॉट' आहे. 'तापमानात सरस कोण,' असा हा सामना असून, या रंगतदार सामन्याचा विजेता कोण, हे सर्वस्वी सूर्यदेवाच्या हातात आहे. गुरुवारी जगातील पहिल्या पंधरा उष्ण देशांमध्ये उभय देशांचे चौदा स्पॉट आहेत.
सध्या करोनामुळे जगातील सगळेच व्यवहार ठप्प आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सामनेही बंद आहेत. तरीसुद्धा या लॉकडाउनमध्ये सध्या भारत पाकिस्तान सामना रंगतोय. सध्या रंगत असलेला हा सामना क्रिकेटचा नाही तर तापमानाचा आहे. गुरुवारी जगभरातील १५ उष्ण शहरांच्या यादीतील १४ शहरांची नावे ही भारत आणि पाकिस्तानातील होती. त्यामुळे लॉकडाउनमध्ये क्रिकेटचा नाही तर तापमानातील सामना रंगतो आहे.
गेल्या सात दिवसांपासून भारतातील बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली आहे. यात प्रामुख्याने राजस्थान, विदर्भ आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. एल्डोराडो वेदर या प्रसिद्ध संकेतस्थळावरून जगभरातील उष्ण शहरांची यादी प्रकाशित केली जाते. गुरुवारी जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीतील १५ पैकी १० शहरे भारतातील तर ४ पाकिस्तानातील होती. कुवैत येथील एका शहरानेही यात स्थान मिळविले होते. यात राजस्थानातील गांधीनगर (४८.९ अंश) प्रथम क्रमांकावर होते.
बुलडाणा सर्वाधिक?
गुरुवारी विदर्भात बुलडाणा येथे सर्वाधिक ४६.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल नागपुरात ४६.३ आणि चंद्रपुरात ४६ अंश तापमान होते. मात्र बुलडाणा शहरात इतकी उष्णता कधीच नसते, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच सुरुवातीला हवामान खात्याने जाहीर केलेल्या तामपानाच्या आकडेवारीत बुलडाणाचे तापमान नोंदविण्यात आले नव्हते. त्यानंतर सुधारित आकडेवारी प्रकाशित करण्यात आली. यावर अनेक हवामानतज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पाऊस परतणार
गेल्या सात दिवसांपासून विदर्भात उष्णतेची तीव्र पसरलेली आहे. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातसुद्धा पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत उन्हाचे चटके कायम राहतील. मात्र शनिवारपासून ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानातसुद्धा २ ते ३ अंशांनी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गंगानगर (भारत)-४८.९
बिकानेर (भारत)-४८
जाकोबाबाद (पाकिस्तान)-४८
नवाबशाह (पाकिस्तान)- ४८
पाड इदान (पाकिस्तान)- ४८
सिबी (पाकिस्तान)-४८
पिलानी (भारत)- ४७.४
कोटा (भारत)- ४७.२
नरनॉल (भारत)- ४७.२
नवी दिल्ली (भारत)- ४७.२
बांदा (भारत)- ४६.८
झांशी (भारत)- ४६.७
बुलडाणा (भारत)- ४६.६
चुरू (भारत)-४६.६
मित्रबाह (कुवैत)- ४६.६