'हावडा'च्या इंजिनला आग, सहायक लोको पायलटचा मृत्यू
धामणगाव नजीकची घटना, मोठा अनर्थ टळला
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या १२८१० हावडा -मुंबई मेलच्या इंजिनमध्ये अचानक धूर पसरल्यावर काय झाले याची पाहणी करीत असताना सहायक लोको पायलटचा खाली पडून मृत्यू झाला, तर लोको पायलटने आकस्मिक ब्रेकचा वापर करून गाडी थांबवली व मोठा अनर्थ टळला. एस.के. विश्वकर्मा (वय ३०) असे या घटनेत मृत्यू झालेल्या सहायक लोको पायलटचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हावड्यावरून येणारी ही गाडी नागपूरला जवळपास २० मिनिटे उशिरा आली. येथे या गाडीचे लोको पायलट बदलले. डी.एन. ब्रह्मे हे लोको पायलट व विश्वकर्मा हे सहायक लोको पायलट इंजिनमध्ये चढले. सध्या तापमान प्रचंड आहे. विदर्भात आधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उन्हाळ्यात अती तापमानामुळे रेल्वेच्या इंजिनमधून किंवा चाकांमधून धूर निघण्याच्या घटना नेहमीच घडत अतात. असाच प्रकार आज झाला असावा, असा अंदाज आहे. सायंकाळी ५ च्या सुमारास ही गाडी तळनी व धामणगाव या स्थानकांदरम्यान होती. यावेळी गाडीचा वेग ताशी ११० प्रति कि.मी. असा होता. गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर निघायला लागला. त्यामुळे लोको पायलट ब्रह्मे यांनी नियंत्रण कक्षाला तशी सूचना दिली. दरम्यान धूर निघण्याचे प्रमाण वाढले होते. गाड़ी ब्रह्मे चालवत होते. इंजिनमध्ये काही बिघाड आल्यास काय झाले हे पाहण्याचे काम सहायक लोको पायलटचे असते. त्यामुळे विश्वकर्मा धावत्या गाडीतच इंजिनला काय झाले हे पाहात असताना त्यांचा तोल गेला व ते खाली पडले, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. इंजिनमध्ये धूर पसरलेला, सहायक खाली पडलेला मात्र तशाही स्थितीत लोको पायलट डी.एन. ब्रह्मे यांनी विचलित न होता आकस्मिक ब्रेकचा उपयोग केला व गाडी थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. लगेच त्यांनी रेल्वे नियंत्रण कक्षाला कळवताच वर्धा येथून अग्निशामक दलाची गाडी तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. खाली पडलेल्या विश्वकर्मा यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना पुलगाव येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत लोको पायलट ब्रह्मे यांचे हात काही प्रमाणात भाजले आहेत. या अपघातामुळे जवळपास ३ तास ही गाडी थांबूनच होती. १९.४४ वाजता नवे इंजिन लावून ही गाडी मुंबईकडे रवाना झाली. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सायंकाळी विस्कळीत झाली होती मात्र रात्री ८ नंतर ती पुन्हा सुरळीत झाली. आधीच प्रचंड ऊन त्यातच इंजिनची देखभाल नियिमत होत नसल्याने व उशिरामुळे होणारा वेळ भरून काढण्याच्या प्रयत्नात असे प्रकार होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.