म. टा. प्रतिनिधी, नागपूर
सध्या संपूर्ण देशभर सुरू असलेली 'मी टू' मोहीम योग्य असून, पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने महिलावर्ग पुरुषांद्वारे होणाऱ्या वा झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवित आहेत. मात्र, पुरुषांविरुद्ध बोलणाऱ्या स्त्रियांच्या प्रामाणिकतेवर साशंकता निर्माण करत मोहिमेबद्दल गैरसमज पसरविणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या तसेच स्त्री अत्याचारविरोधी परिषदेच्या प्रमुख सीमा साखरे यांनी मंगळवारी केले.
सध्या 'मी\R टू' मोहीम सुरू असून बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शक तसेच निर्मात्यांची झोप त्यामुळे उडाली आहे. रोज नवनवे आरोप होत आहेत. त्यामुळे अनेक कलाकारांनी याचा धसका घेतला आहे. मालिका, सिनेमांमध्ये बोल्ड दृश्ये देण्यासही कलाकार नकार देत आहेत. प्रत्येक कलाकाराने 'मी\R टू' वर प्रतिक्रिया द्यावी म्हणून पत्रकारही धडपडत आहेत. अमेरिकेतून सुरू झालेली ही मोहीम आता आपल्याकडे जोर पकडू लागली आहे. महिला बोलायला लागल्या आहेत, ही बाब चांगली असल्याचे सांगत सीमा साखरे यांनी याला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे म्हटले.
अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांनी दिलेल्या 'बघून घेऊ' या प्रतिक्रियेचा खरपूस समाचार घेत अशा प्रकारचा पुरुषी हेका ते कसे काय मिरवू शकतात? स्त्री विरोधात बोलल्यानंतर पुरुषांना इतके आक्रमक होण्याची गरज का वाटते? नानाप्रमाणेच पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनीदेखील दिलेल्या आक्रमक प्रतिक्रियानंतरही स्त्रियांनी बोलूच नये का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्या म्हणाल्या.
महिलांना कुठल्याही पुरुषाविरुद्ध बोलताना स्वत:सह तिच्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार करावा लागतो. यामुळे त्या बोलायला वेळ घेतात. याचा अर्थ त्या विलंबाने बोलत असल्यास अप्रामाणिक असल्याचा ठपका ठेवणे सर्वस्वी चुकीचे असल्याचे सीमा साखरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आयटी सेक्टरमधील महिलांबाबत चिंता व्यक्त केली. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराच्या बळी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
......