हृदयरोगतज्ज्ञांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
गेले काही दिवस राज्यातील सत्तागोंधळाच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एकाएकी अँजिओप्लास्टी झाल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांची लेखन करतानाची छायाचित्रे आल्यानंतर तर अनेकांच्या भुवया जास्तच उंचावल्या. मात्र, अँजिओप्लास्टी केल्यानंतर अगदी सहा-सात तासांमध्ये माणूस 'नॉर्मल' होऊ शकतो. त्यामुळे, राऊतांच्या 'त्या' छायाचित्रांमध्ये काहीही आश्चर्य वाटण्याजोगे नसल्याचे मत शहरातील हृदयरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊतांच्या 'लीलावती' प्रकरणामुळे अँजिओप्लास्टी आणि त्यातून त्यांचे लगोलग बरे होणे यावर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. हृदयरोग, अँजिओप्लास्टी म्हटले की रुग्ण अनेक दिवस रुग्णालयात भरती असतो, अशी रुग्णांची धारणा आणि अनुभव असतो. याउलट, संजय राऊत तर लगेचच ठणठणीत झाल्याची दृश्ये आणि चित्रे बघितल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले होते. मात्र, अँजिओप्लास्टीनंतर रुग्णाची ४८ तासांमध्ये रुग्णालयातून सुटीही होऊ शकते, असे मत नागपुरातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
अँजिओग्राफी ही निदानपद्धती आहे. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज शोधण्यासाठी ही एक्स-रे आधारित प्रक्रिया १० ते १५ मिनिटांत करण्यात येते. अँजिओग्राफीच्या आधारे अँजिओप्लास्टीबद्दल निर्णय घेण्यात येतो. रुग्णाची परिस्थिती कशी आहे, यावर किती तातडीने उपचार करावयाचेत, याचा निर्णय घेण्यात येतो. हृदयविकाराचा झटका आला असल्यास रुग्णालयात आल्यापासून ते शस्त्रक्रिया सुरू करेपर्यंतची प्रक्रिया ९० मिनिटांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. रुग्णाला जास्त त्रास नसेल तर नियोजन करून शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेज दूर करून स्टेंट टाकले जाते. हे स्टेंट आयुष्यभरासाठी शरीरात राहते. स्थानिक भूल देऊन रुग्णावर ही शस्त्रक्रिया केली जाते आणि अवघ्या काही तासांमध्ये रुग्ण नेहमीप्रमाणे बोलू-वागू शकतो. अँजिओप्लास्टीमध्ये शस्त्रक्रिया किती लवकर होते हे महत्त्वाचे असते. ब्लॉक काढल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नाट्यमय वाटावे, अशाप्रकारे वेदना नाहीशा होतात, असे डॉ. जगताप यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
औषधांशी नको मनाने खेळ...
हृदयरुग्णांनी दिलेली औषधे काळजीपूर्वक घेणे आवश्यक असते. अनेकदा वर्षभरानंतर रुग्ण स्वत:च्या मनाने किंवा इतरांच्या सल्ल्याने औषधे बंद करतात. त्यानंतर लगेचच अवघ्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्याची उदाहरणे आहेत. डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत औषधे बंद करू नयेत. छाती दुखत असल्यास तातडीने रुग्णालयात जावे. जितक्या लवकर उपचार होतील, तितके रुग्णाचा जीव वाचण्याचे प्रमाण वाढते. आठ ते दहा तासांनी उपचार झाल्यास रुग्णाचे हृदय आणखी कमकुवत होत जाते आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असे डॉक्टर्स सांगतात.
बायपास म्हणजे मोठी शस्त्रक्रिया
अँजिओप्लास्टी आणि बायपास यांच्यात मोठाच फरक आहे. बायपास ही मोठी शस्त्रक्रिया असून त्यात रुग्णाला पूर्णत: बेशुद्ध केले जाते. त्यानंतर रुग्णाची छाती उघडून शस्त्रक्रिया केली जाते. बायपासनंतर रुग्णाला सर्वसाधारण परिस्थितीत येण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात आणि किमान आठ दिवस रुग्णालयात मुक्काम करावा लागतो. अशा रुग्णाला दोन महिने तरी आराम करणे आवश्यक ठरते.
अँजिओप्लास्टी असेल तर काळजी घ्या...
- अँजिओप्लास्टी केल्यानंतर क्वचित रक्तस्राव होऊ शकतो.
- स्टेंट टाकल्यानंतरही २०० रुग्णांपैकी एका रुग्णात पुन्हा ब्लॉकेज येऊ शकतो.
- सहा महिने ते एक वर्षात पुन्हा ब्लॉकेज येण्याची शक्यता काही रुग्णांमध्ये असू शकते.
- शस्त्रक्रियेनंतर वजन, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, धूम्रपान यावर नियंत्रण ठेवावे.
- अँजिओप्लास्टीनंतर सांगितल्यानुसार आहार आणि व्यायाम दक्षतेने करावा.