म. टा. प्रतिनिधी, नागपूर
शुक्रवारी विदर्भासह नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ३ नंतरच ढगाळ वातावरण तयार झाल्याने आज चटक्यांपासून दिलासा मिळेल, अशी आशा नागपूरकरांना होती. मात्र वादळ वाऱ्यातसुद्धा पाऱ्याने आपला कमाल दाखविला आणि कमाल तापमान ४६ अंशांपेक्षा अधिकच ठेवले. शुक्रवारी ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४७.१ आणि त्या खालोखाल नागपुरात ४६.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र असून विदर्भवासीयांचे यंदा अक्षरश: हाल होत आहे. यंदा उष्णतेच्या लाटेचा कालावधी अधिक असून त्यामुळे दिवसेंदिवस उष्माघाताच्या बळींमध्ये भर पडतच आहे. शुक्रवारी दुपारी ३ नंतर विदर्भात अनेक ठिकाणी आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे आज चांगला पाऊस होणार, अशी आशा निर्माण झाली. मात्र, नागपूर शहरात पावसाने हजेरी लावलीच नाही. ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. नागपुरात केवळ काही काळासाठी वारे वाहत होते. ३० ते ४० किमी ताशी वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे धुळीचे वादळ तयार झाले. यामुळे तापमान कमी होईल, असे वाटत होते. परंतु नागपुरातील तापमानात गेल्या चोवीस तासांच्या तुलनेत केवळ ०.१ अंशांची घसरण झाली. तसे पाहता विदर्भातील सगळ्याच शहरांमधील तापमानात घसरण झाली. तरीसुद्धा ७ शहरांचे तापमान हे ४५ अंशांहून अधिकच होते. त्यामुळे वादळी पावसाचा तापमानावर फारसा फरक पडला नाही. पुढील सात दिवस नागपूर, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या कालावधीत या शहरांमधील तापमान हे ४५ ते ४७ च्या आसपासच राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे १३ ते १५ जूनच्या दरम्यान पावसाळी आणि ढगाळ वातावरण वाढून विदर्भात थोडासा गारवा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
......