रद्द होण्याची दाट शक्यता
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या आविष्कार महोत्सवाला यंदाही संलग्नित कॉलेजेसकडून थंड प्रतिसाद मिळाला आहे. इतकेच काय, तर लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था आणि ४० पदव्युत्तर विभागांकडून एकही संशोधन 'आविष्कार'साठी सादर झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून हा महोत्सवच रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कुलपती कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या आविष्कार महोत्सवाला नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजेस व पदव्युत्तर विभागांकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठात तब्बल ५३५ संलग्नित कॉलेजेस आणि ४३ पदव्युत्तर विभाग आहेत. त्यापैकी केवळ २५ कॉलेजेसकडूनच संशोधन प्रकल्प ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी दाखल झाले आहेत. तर, त्या चमूंमधून सर्वोत्तम चमूला १५ जानेवारीला गोंडवाना विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार महोत्सवासाठी निवडण्यात येणार आहे. परंतु, प्राप्त झालेल्या संशोधनाची संख्या व दर्जा बघता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व राज्यस्तरीय महोत्सवात होईल काय, असा प्रश्न विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालक डी. के. कावडकर यांनाही पडला आहे.
यासंदर्भात कावडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'दरवर्षी विद्यापीठात आविष्कार महोत्सव आयोजित होतो. साधारणपणे ८० ते ९० चमूच अविष्कार समारोहात सहभागी होत असल्याचे आजवरचे चित्र आहे. त्यामुळे यंदा ही संख्या वाढावी म्हणून गेल्या महिनाभरापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य व पदव्युत्तर विभागांच्या प्रमुखांना संशोधन प्रकल्प सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच प्रत्यक्ष दूरध्वनी, मोबाइलवर एसएमएस तसेच कॉलेजला ई-मेल पाठवूनही प्रस्ताव मागवण्यात आले होते. परंतु, फक्त २५ कॉलेजेसकडूनच प्रतिसाद मिळाला आहे. विद्यापीठाच्या आविष्कारला इतका अत्यल्प प्रतिसाद बघून मलाच दु:ख होत आहे.'
दरम्यान, विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांकडून तरी संशोधन प्रकल्प सादर होतील, अशी अपेक्षा करण्यात आली होती. विद्यापीठात दरवर्षी किमान ५०० जणांना पीएच.डी. प्रदान करण्यात येते. तर विद्यापीठाच्या विभागांमध्येही संशोधन होत असल्याचा दावा करण्यात येतो. परंतु, त्या संशोधनाला स्पर्धेत पाठवण्यात विभागप्रमुख व संबंधित प्राध्यापक का घाबरतात, ते कळत नाही. सन २००७मध्ये नागपूर विद्यापीठात पहिला आविष्कार महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या महोत्सवात समन्वयक म्हणून काम केले होते. त्यावेळी अनेक प्रकल्प सादर झाले होते. परंतु, आता कॉलेजेस व विभागांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटत आहे, असेही डॉ. कावडकर यांनी नमूद केले.
-तर ओढवणार नामुष्की
विद्यापीठ स्तरावरील आविष्कार महोत्सवासाठी संशोधन सादर करण्याची आज, शनिवारी अंतिम मुदत आहे. तर ३ जानेवारीला सी. पी. अॅण्ड बेरार कॉलेजमध्ये महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कॉलेजेसकडून प्रतिसाद न मिळाल्यास हा महोत्सव आयोजित करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे शनिवारी विद्यापीठात रुजू होत आहेत. ते आल्यानंतर त्यांच्याकडे आविष्कार महोत्सवाची संपूर्ण माहिती सादर करण्यात येईल. त्यानंतर महोत्सवाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. कावडकर म्हणाले.