म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
गेल्या अनेक वर्षांपासून घराघरांतून कचरा गोळा करणाऱ्या कनक रिसोर्स मॅनेजमेंट या कंपनीत कार्यरत ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीत सामावून घ्यावे, ही मागणी पुढे आली आहे. महिन्याभरात शहरात दोन भागात दोन कचरा संकलन करणाऱ्या कंपन्या कार्यरत होणार आहे. त्यामुळे कनकमध्ये सध्या कार्यरत १,७०० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी आहे.
शहरात कचरा संकलनाचे खासगीकरण झाल्याने 'कनक'ला हे काम देण्यात आले होते. संपूर्ण शहरात एकच कंपनी कार्यरत असल्याने कंपनीने मोठ्या संख्येत कर्मचारी भरती केले. आता या कंपनीचे काम संपुष्टात येणार आहे. या कंपनीऐवजी मनपाने दोन कंपन्यांना कचरा संकलनाचे काम दिले आहे. या कंपनीकडून लवकरच कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे 'कनक'च्या जुन्या कर्मचाऱ्यांना सामावून घेताना ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहेत, अशांचाही मानवीय आधारातून विचार व्हावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केले आहे. मनपाने झोन क्र. १ ते ५ अर्थात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर या पाच झोनची जबाबदारी ए. जी. एन्व्हायरो प्रा. लि. आणि झोन क्र. ६ ते १० अर्थात गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर आणि मंगळवारी या झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी प्रा. लि. या कंपनीला दिली आहे. या दोन्ही कंपनीला सध्या 'कनक'मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. सध्या 'कनक'मध्ये १७०० कर्मचारी असून, गेल्या पंधरा वर्षांपासून ते कंपनीला सेवा देत आहेत. नवीन कंपनीने ५० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना घेण्यास नकार दिला आहे. आता या कर्मचाऱ्यांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी संबंधित नव्या कंपनीसोबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. आता हे आश्वासन पाळून त्यांना सेवेत घेण्याबाबत गंभीरतेने विचार करून प्रश्न सोडवावा, अशी विनंती कर्मचाऱ्यांतर्फे पत्रकातून केली आहे. यासंदर्भातील निवेदनपत्र मनपाच्या अतिरिक्त आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी(स्वच्छता) यांना देण्यात आले आहे.
.......