म.टा. प्रतिनिधी, नागपूर
डोळे वटारणाऱ्या सूर्यामुळे पारा रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. तळपत्या उन्हाने आपली रग दाखवणे सुरू केले आहे. तापमानामुळे शरीराचीही लाहीलाही होणे सुरू झाले आहे. नवतपा सुरू झाल्याने उन्हामुळे दुपारी शहरातले रस्ते रिकामे दिसणे सुरू झाले आहे. वाढत्या तापमानाचा आरोग्यावर होणारा परिणाम पाहता नागपूरकरांचीदेखील काहिली वाढली आहे.
गेल्यावर्षी उष्माघाताने एकट्या नागपुरात ३०हून अधिक जणांनी प्राण गमावले होते. यंदाच्या उन्हाळ्यात कोणत्याही कुटुंबावर अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी मेडिकलमधील यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उष्ण वारे अंगाला झोंबल्याने उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण वाढतात. उष्ण वाऱ्याची झळ बसल्यानंतर व्यक्तीला ज्वर चढतो. शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे व्यक्ती दगावण्याचीही शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर मेडिकलमध्ये दरवर्षी 'कोल्ड वॉर्ड'ची स्वतंत्र यंत्रणा तैनात केली जाते. त्यासाठी १० खाटा दरवर्षी आरक्षित केल्या जातात. उन्हाळी अथवा उष्माघाताच्या रुग्णावर येथे सर्वसामान्य तापाप्रमाणे इलाज करून त्याच्या तापेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. उन्हाळ्यात वाढणाऱ्या या रुग्णांची संख्या पाहता 'कोल्डवॉर्ड' रेडी ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षकांनी दिल्या आहेत.
शंभर खाटा राखीव
मेडिकलमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी १४०१ खाटा आहेत. त्यापैकी १०० खाटा बालरुग्णांसाठी आरक्षित आहे. बालकांसाठी मेडिकलमध्ये वॉर्ड क्रमांक ३, ५, ६ आणि ८ असे चार वॉर्ड आहेत. ऊन लागल्याने लहान मुलांना ताप, सर्दी, खोकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हायग्रेड फिवर रुग्णांसाठी इथे विशेष काळजी घेतली जाते. हा वॉर्ड प्रशासनाने तयार केल्याचे मेडिकलचे अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांनी सांगितले .
उन्हात फिरताना घ्या काळजी
- शक्यतो उन्हात उपाशी पोटी फिरू नका.
- उन्हातून आलेल्या मुलांना एकदम पाणी प्यायला देऊ नका.
- शीतपेय, जंकफूडचा आहार उन्हाळ्यात टाळा.
- उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी पाणी, काकडी, लिंबूपाणी अथवा ताक-मठ्ठा प्या .
- डोक्याला पांढरा रुमाल अथवा टोपी असू द्या.
उन्हामुळे मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सिअस तापमान कायम राखते. सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणे अत्यंत गरजेचे आणि अत्यावश्यक आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते. त्यामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५°अंशाच्या पुढे जाते आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंशा°च्या पुढे जाऊ लागते. शरीराचे तापमान जेव्हा ४२° अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागते. त्यामुळे दुष्परिणाम होतात.