गजानन धांडे, बुलडाणा
जिल्हानिर्मितीच्या दीडशे वर्षाच्या इतिहासात ‘साहित्यमेळा’ अनुभवण्याची मोठी संधी हिवरा आश्रमच्या निमित्ताने चालून आली होती. दिल्ली, बडोदा आणि हिवरा आश्रम असे तीन प्रस्ताव ९१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी पुढे आले होते. दिल्ली सर करू म्हणता म्हणता ऐनवेळी तेथील आयोजकांनी माघार घेतल्याने हिवरा आश्रमवर शिक्कामोर्तब झाले. ग्रामपंचायतस्तरावरील परिसरात पहिल्यांदाच संमेलन आयोजनाचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य संस्थानने दाखविले. राजमाता जिजाऊ, संत चोखामेळा, कविवर्य ना. घ. देशपांडे, श्रीपादकृष्ण कोल्हटकर ते आजघडीचे कादंबरीकार सदानंद देशमुखांच्या प्रबोधनपर चळवळीशी नाते सांगणाऱ्या मातृतीर्थ जिल्ह्याला हा मिळालेला बहुमान होता. अंनिसचे श्याम मानव यांनी आश्रमाचे शुकदास महाराज यांच्यावर टीका करीत संमेलन आणि वाद या प्रक्रियेला नवे वळण दिले. शुकदास महाराज यांच्या हयातीतील त्यांच्यावर सिद्ध न झालेल्या आरोपांवरून रणकंदन माजवित विरोध केला. विवेकानंद आश्रमाने तेवढ्याच ताकदीने विरोध केला. जिल्ह्यातूनही मानव यांच्या विरुद्ध निषेधाचे सूर उमटले. अंनिसमध्ये काम करणाऱ्यांनीही आरोपांवर सावध पवित्र घेत हिवरा आश्रम येथे संमेलन व्हायला काही हरकत नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या. आश्रमाच्या प्रतिमेला अकारण धक्का पोहचत असल्याने तसेच महाराजांच्या निधनानंतर त्यांच्यावरील आरोपांमुळे स्वाभिमान दुखावलेल्या संस्थानने संमेलन आयोजनातून माघार घेतली. दरवर्षी विवेकानंद विचार साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले. वादावर पडदा पडला आणि शुकदास महाराजांच्या कर्मभूमित होणारे संमेलन मात्र बारगळले.
राजकीय पातळीवर विद्यमान सरकार अर्थात भाजपवर सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीनेही आंदोलनात्मक विरोधाचे दरवाजे ठोठावले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. पेट्रोल, डिझेल व दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. काँग्रेसने सायकल व कंदील मोर्चा काढला. त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही भाववाढीचा निषेध नोंदविला. पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी माजी मंत्री सुबोध सावजी व सहकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीने राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याशी चर्चा करून पुरावे दिले. रावते यांनी शेगावातून विदर्भ संपर्क प्रमुखपदाच्या कामाला मेळावा घेत प्रारंभ केला. विदर्भात भाजपला मात देण्यासह पश्चिम विदर्भात अंतर्गत कलह संपविण्यासाठी शिवबंधन घट्ट करण्याचे आवाहन केले. शिवाय २०१९मध्ये एकहाती सत्ता आल्यास राज्याचा मंत्रिमंडळ शपथविधी सिंदखेडराजा मातृतिर्थाच्या पायथ्याशी घेणार असल्याचे जाहीर केले.
खामगाव आणि अवैध सावकारी पुन्हा सिद्ध झाली. चार लाखाच्या कर्जापायी सावकाराच्या तगाद्यापायी श्रीराम जामोदे, देवेंद्र आणि नरेंद्र या तिघा पिता-पुत्रांनी विष घेतले. नरेंद्रचा यात मृत्यू झाला. खामगावातच सामान्य रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेल्याने खळबळ उडाली. सुमय्या परवीन या महिलेच्या दोन दिवसाच्या बाळाला बुरखाधारी महिलेने पळविले होते. अस्थायी नर्स आणि सुरक्षा रक्षकाला यात बडतर्फ करण्यात आले असले तरी रुग्णालये आणि तेथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचेच निष्पन्न झाले आहे. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावतीने दारूमुक्ती निर्धार परिषद सत्यपाल महाराज व पारोमिता गोस्वामी यांच्या उपस्थितीत पार पडली. यात ‘उभी बाटली आडवी करण्याचा’ निर्धार व्यक्त झाला. तर स्वस्त धान्याच्या काळाबाजाराशी संबंध असल्याचे पोलिस कारवाईत उघड झाले. गावचे कारभारीपद मिळण्यासाठी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत रंगत वाढली असून ‘अर्थ’ वलयसुद्धा या निवडणुकीला प्राप्त झाले आहे.