३ मेपूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
एअरपोर्ट आणि रेल्वेचे अडीच तासांचे तीन ब्लॉक मिळत नसल्याने खापरी उड्डाणपुलाचे काम रखडले होते. मात्र, आता लॉकडाउनमुळे विमानसेवा आणि रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंदच असल्याने हे ब्लॉक मिळणे शक्य आहे. त्यामुळे 'एनएचएआय'ने मॉक टेस्ट घ्यायला सुरुवात केली असून रेल्वे आयुक्तांना नव्याने प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. कामातील हा अडसर ३ मेच्या आत दूर करण्यासाठी 'एनएचएआय'ची यंत्रणा कामाला लागली असल्याचे 'एनएचएआय'चे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुविधांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. खापरी उड्डाणपूल हा अतिशय रुंद असल्यामुळे याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो आणि अपघाताच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे ६० कोटी रुपये खर्चाच्या १ किलोमीटरच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या पुलाच्या कोनशिलेचे अनावरण २५ जून २०१७ रोजी करण्यात आले होते. खापरी येथील उड्डाणपूल लवकरात लवकर करण्याचा मानस होता. मात्र, पूलनिर्मितीच्या कामात अनेक अडचणी आल्याने हे काम मागे पडत गेले.
रेल्वे आयुक्तांना नव्याने प्रस्ताव
तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हे काम रखडले आहे. १.१ किलोमीटरचा हा पूल जवळपास पूर्ण झाला असून, ब्लॉक मिळाले तर पुढील दोन महिन्यांत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. लॉकडाउन असल्याने रेल्वे आणि एअरपोर्ट प्राधिकरणाकडून तीन ब्लॉक मिळणे शक्य आहे. या दिशेने आता कामाला गती देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून मॉक टेस्टचे काम हाती घेण्यात आले आहे. यात गर्डर जमिनीवर ठेऊन काम करण्याचा सराव केला जातो. मंगळवारीही एक मॉक टेस्ट होणार आहे. रेल्वेच्या प्रवासी फेऱ्या बंद असल्या तरी मालगाड्या सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या आयुक्तांना येत्या दोन दिवसांत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालकांनी सांगितले.