म. टा. वृत्तसेवा, गोंदिया
भारतीय राज्यघटनेने ओबीसी प्रवर्गाला संवैधानिक अधिकार देत 'मागावसर्गीय' असा दर्जा दिला. आजपर्यंतच्या प्रत्येक सरकारने ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार बहाल करण्याकरिता प्रयत्न केले नाहीत. म्हणून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन दाबण्यासाठी प्रयत्न केले. आता हे सारे पुरे झाले. ७० कोटी जनता असलेल्या या प्रवर्गाने ठरविल्यास सत्ता आणि कायदेही ओबीसींचेच राहतील. नेत्यांनो, यापुढे ओबीसी हिताचेच बोला, त्यातच तुमचे हित आहे, असे परखड मत ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी व्यक्त केले.
ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी राष्ट्रीय महासंघ, ओबीसी सेवा संघाच्यावतीने ओबीसी जनगणनेकरिता जनजागृती चेतना यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी; बुधवारी गोंदियातील प्रशासकीय भवनासमोर करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, मार्गदर्शक ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे तर अतिथी म्हणून ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. एम. करमकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे, ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. सविता बेदरकर, संभाजी ब्रिगेडचे क्रांती ब्राम्हणकर, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलम हलमारे आदी उपस्थित होते.
ढोबळे म्हणाले, महात्मा गांधी यांनी लढलेली स्वातंत्र्याची लढाई राजकीय होती. त्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. त्या लढ्यात सर्वाधिक ओबीसी प्रवर्ग होता. या प्रवर्गाला अद्याप सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गाला न्याय द्यायचा असेल तर सर्वांत आधी न्यायव्यवस्थेत या प्रवर्गांचे प्रतिनिधी जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बबलू कटरे यांनी ओबीसी समाजाला त्यांचे अधिकार का मिळाले नाहीत? जनगणनेचे फायदे, अन्याय कुणामुळे आणि कशामुळे झाला यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. खुशाल बोपचे यांनी संसदेत ओबीसी खासदारांची कशाप्रकारे दिशाभूल करण्यात येते यावर मार्गदर्शन केले.
संचालन मनोज मेंढे व सुनील पटले यांनी केले. आभार राजीव ठकरेले यांनी मानले. कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौकादरम्यान रॅली काढण्यात आली.
'ओबीसींच्या प्रश्नांवर मी सोबत'
कार्यक्रमस्थळाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनीही हजेरी लावली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावाला आपण संमती दर्शविली होती. ओबीसी प्रवर्ग अद्याप मागासलेला आहे. पंतप्रधान मोदी यांना मी ओबीसींच्या स्वतंत्र जणगणनेकरिता पत्र लिहिणार आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर आपण सोबत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे, आ. अग्रवाल हे व्यासपीठाऐवजी जनतेत बसून होते.