स्मार्ट सिटी भागातील नागरिकांनी मांडल्या अपेक्षा
म.टा.प्रतिनिधी,नागपूर
पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकसित होणाऱ्या भरतवाडा, पुनापूर भागातील नागरिकांनी 'आमच्या डोक्यावर छप्पर असू द्या', अशी आर्त हाक दिली. काहींनी प्रकल्पाला विरोध नसल्याचे सांगत, बेघर होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. जवळपास आठ किलोमीटर लांब पसरलेल्या या भागात अधिकाऱ्यांनी पाहणी करीत त्यांच्यात विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पूर्व नागपुरातील हा भाग प्रस्तावित स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी निश्चित करण्यात आला आहे. या भागातील घरे पाहण्यासाठी व तेथील लोकांना प्रकल्पाबाबत माहिती देऊन त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी हा दौरा होता. यावेळी नागरिकांनी अधिकारी, लोकप्रतिनिधींपुढे 'आमची घरे वाचवा' असा टाहो फोडला.
स्मार्ट सिटी प्रकल्पावर साडेसहाशेवर हरकती आल्या. त्यामुळे या हरकती निकाली काढण्यापूर्वी या भागाचा दौरा करून तेथील नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत शनिवारी सायंकाळी या भागाचा दौरा केला. सुमारे अडीच तासांच्या या दौऱ्याचा प्रारंभ नेताजीनगरातून झाला. त्यानंतर गुजराती कॉलनी, भरतवाडा रोड, भारतनगर, गुलमोहरनगर, सुभाननगर, पूनापूर, पारडी येथील भवानी मातेच्या मंदिरापर्यंत करण्यात आला. या दौऱ्यात काँग्रेसचे उमाकांत अग्निहोत्री, शिवसेनेचे रविनीश पांडे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक प्रदीप पोहाणे, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, सरिता कावरे, राजकुमार सेलोकर, यांच्यासह स्मार्ट सिटीबाधित नागरिक सेवा मंचमधील विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकल्पावर ९२ टक्के नागरिक समाधानी असल्याचा दावा केला. या प्रकल्पात केवळ ८ टक्के नागरिकांची घरे जात आहेत. त्यांचे पुनवर्सन केल्याशिवाय त्यांना उठविण्यात येणार नसल्याचे सांगितले. या प्रकल्पाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या काही नेत्यांनी विरोधाची भाषा करीत नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. आज प्रत्यक्ष भेटीतून ही भीतीही दूर झाल्याचा दावा आमदार खोपडे यांनी केला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ डॉ. रामनाथ सोनावणे यांनी नागरिकांच्या आलेल्या हरकती तपासून त्या भागांना भेटी देण्यात आल्या. अनेकांच्या तक्रारी गंभीर आहेत. त्याची निश्चितच दखल घेण्यात येईल, असे सांगत ज्यांची घरे जात आहेत त्यांना चिंता होणे स्वाभाविक असल्याचे सांगितले. परंतु, प्रकल्प साकारताना नागरिकांचे नुकसान जास्त होऊ नये, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच, दौऱ्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचेही डॉ. सोनावणे यांनी आभार मानले.
नागरिकांच्या काही सूचना
-रस्त्यांचे रुंदीकरण करताना मध्यभागातून दोन्ही बाजूंनी सारखेच रुंदीकरण करावे
-एखाद्या रस्त्यामध्ये शेकडो घरे जात असतील तर त्यावर उपाय शोधावा
-स्मार्ट सिटी योजनेत संपूर्ण बहुमजली इमारती उद्यानांमध्ये जात आहे, यावर काही मार्ग काढावा
-म्हाडा कॉलनी, गुलमोहरनगर आणि गवळीनगरातील एका रस्त्यासाठी तीनशे घरे जात आहे, याकडेही लक्ष असावे