प्रीती बारिया हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप
म टा...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेत रूपांतरित केले.
भंडारा सत्र न्यायालयाने ३० जून २०१८ रोजी आरोपी अमीर व सचिन या दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला कायम करण्यासाठी राज्य सरकारने न्या. प्रदीप देशमुख आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर अर्ज केला आहे तसेच आरोपींनीही शिक्षेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे.
भंडारा येथील तकिया वॉर्डात बारिया यांचे घर आहे. तिथे ३० जुलै २०१५ रात्री एसी दुरुस्त करण्याच्या कारणाने बारिया यांच्या घरात आरोपींनी प्रवेश केला. त्यानंतर संधी पाहून प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांना ठार मारले. दरम्यान, बारिया यांचा ९ वर्षांचा मुलगा भव्य घटनास्थळी आला. तेव्हा आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले. त्यामुळे भव्यला कायमचे अपंगत्व आले. त्यापूर्वी आरोपींनी दुपारी म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरीदेखील एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला होता व त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीलाही कायमचे अपंगत्व आले आहे. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणे, संधी पाहून घरातील व्यक्तींचा खून करणे व त्यानंतर घरातील मुद्देमाल चोरून नेणे ही आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत होती. सत्र न्यायालयात २६ साक्षीदार तपासण्यात आले होते. तर त्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सरकारतर्फे अॅड. नीरज जावडे तर, आरोपींतर्फे अॅड. ओमप्रकाश गुप्ता बाजू मांडली.
व्हिडीओ कॉन्फरन्सने निकाल वाचन
न्या. प्रदीप देशमुख यांनी मुंबईहून तर न्या. पुष्पा गनेडीवाल यांनी नागपुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याप्रकरणाच्या निकालाचे वाचन केले. आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात येत असल्याचे न्या. देशमुख यांनी जाहीर केले.
.....