म. टा. प्रतिनिधी, नागपूर
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी पाच नामांकन अर्ज दाखल असून त्यापैकी कोण अर्ज परत घेणार की पाचही जण निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटून उभे राहणार याचा निर्णय आज, सोमवारी होणार आहे.
१४ ऑक्टोबरपर्यंत ५ उमेदवारांचे ११ उमेदवारी अर्ज महामंडळाला प्राप्त झाले होते. त्यात डॉ.किशोर सानप, डॉ.रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान या साहित्यिक आणि समीक्षकांचा समावेश आहे. डॉ. किशोर सानप यांनी बडोदा मराठी वाङ्मय परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि विदर्भ साहित्य संघाकडून अर्ज दाखल केला तर प्रा. रवींद्र शोभणे यांनी मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ आणि औरंगाबाद मराठवाडा साहित्य परिषदेतून अर्ज दाखल केला आहे. रवींद्र गुजर यांनी पुणे मराठी साहित्य परिषदेतून तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुणे मराठी साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषदेतून अर्ज दाखल केले आहेत. डॉ. रवींद्र शोभणे यांनी यंदा आपण माघार घेणार नसल्याचे निक्षून सांगितले असून डॉ. किशोर सानपदेखील मागे हटण्यास तयार नाहीत. सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामांकन अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत असून उर्वरित तिघांमधून नेमका कोण अर्ज मागे घेता आणि निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहतात, याची उत्सुकता साहित्य वर्तुळात आहे. मतमोजणी व निकाल १० डिसेंबरला होणार असून त्या दिवशी नियोजित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाणार आहे.