नागपूर : आईची निर्घृण हत्या करणाऱ्या चंद्रपूर येथील निवासी कौस्तुभ हेमंत कुलकर्णी याच्या फाशीच्या शिक्षेवर १७ जानेवारीपासून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अंतिम सुनावणी होणार आहे. चंद्रपुरातील तुकुम परिसरातील निवासी अंजली कुलकर्णी यांची त्यांचाच मुलगा कौस्तुभ याने हत्या केली. आरोपीवर कर्जाचा डोंगर होता. त्यामुळे त्याचा कुटुंबीयांसोबत नेहमीच वाद होत होता. २० एप्रिल २०१६ रोजी आरोपीचे आईसोबत भांडण झाले. त्यातच आरोपीने आईच्या हाताची नस कापली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. २३ मे २०१८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. राज्य सरकारने आरोपीची फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात सादर केले आहे. तसेच, आरोपीने शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर आता १७ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होणार आहे. हे हत्याप्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ नसल्याचा दावा आरोपीने केला आहे, तर सरकारने फाशी कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे. आरोपीतर्फे अॅड. राजेंद्र डागा तर, सरकारतर्फे अॅड. नीरज जावडे यांनी बाजू मांडली.
आईची हत्या; फाशीवर हायकोर्टात अंतिम सुनावणी
आईची निर्घृण हत्या करणाऱ्या चंद्रपूर येथील निवासी कौस्तुभ हेमंत कुलकर्णी याच्या फाशीच्या शिक्षेवर १७ जानेवारीपासून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर ...
Maharashtra Times 18 Dec 2018, 4:00 am