म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
विदर्भातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसह वेगळ्या विदर्भाबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी, असा आक्रमक पवित्रा विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे संस्थापक माजी खासदार दत्ता मेघे यांनी घेतला. विदर्भाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेची केंद्रीय कार्यकारिणी तसेच, विदर्भातील अध्यक्ष व शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी खामला येथे झाली. यात वेगळा विदर्भ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नागपूरच्या धर्तीवर संपूर्ण विदर्भाचा विकास आणि ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. येत्या २६ एप्रिल रोजी सर्व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांना देण्यात येणार आहे. कर्जमाफीबाबत ३० तारखेपर्यंत सर्व जिल्हाध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी विदर्भाच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. त्यांनी प्रतीक्षा करण्यास सांगितले. विदर्भाबाबत भाजप व सरकारने भूमिका स्पष्ट करावी, यासाठी परत भेट घेण्यात येईल, असे मेघे म्हणाले. विदर्भात अधिकाधिक निधी आणून विकास करण्याचे धोरण भाजपचे दिसत आहे. वैदर्भीयांना विकसित राज्य देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे पुढच्यावर्षीपर्यंत याचा विचार होऊ शकतो, असे ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रतापसिंग चव्हाण, महेश पुरोहित, मनोरमा जयस्वाल, साधना सराफ उपस्थित होत्या.
कर्जामुळे शेतकरी त्रस्त आहेत. विदर्भातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. या धर्ती सर्वत्र विकास करण्यात यावा. सरकारने ज्येष्ठ नागरिकांना विविध सोयी-सवलती देणारे धोरण स्वीकारले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. विदर्भात कुपोषण कमी होण्याऐवजी वाढत आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे, यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीला विनय कोतपल्लीवार, विलास कांबळे, विजय घाडगे, डॉ. भगवान गोटे, चंद्रजीत भुयार, युवराज कराडे, विजय उजवणे, धनंजय नालट, कृष्णसिंग राठोड उपस्थित होते.