म. टा. प्रतिनिधी, नागपूर
महिलांमध्ये झपाट्याने स्तनाच्या कर्करोगाचा विळखा वाढत आहे. हल्ली कर्करोगाच्या निदानाचे तंत्रज्ञान सहज आणि सोपे झाले आहे. देशात निदान होणाऱ्या कर्करोगाची व्याप्ती पाहता यात महिलांची संख्या देखील वाढत आहे. आजघडीला देशात रोज दोन हजार महिलांना कर्करोगाचा विळखा पडत असल्याची माहिती ज्येष्ठ ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. अजय मेहता यांनी रविवारी येथे दिली.
जगभरात ऑक्टोबर महिना स्तनाच्या कर्करोगासाठी जागृती महिना म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर एचसीजी, एनसीएचआरआयच्यावतीने रविवारी विशेष जागृती कार्यक्रम घेण्यात आला. स्तनाच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या महिलांविषयी नैतिक पाठबळ आणि त्यांच्या विषयी सहवेदना प्रकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हितगूज साधले. त्यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मेहता म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील महिलांना जडणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाविषयी चिंता व्यक्त केली आहे. विकसित देशांमध्ये महिलांच्या कर्करोगाचे वेळीच निदान होते. त्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊन दगावणाऱ्यांचे प्रमाण तिथे नगण्य आहे.’
हा धागा पकडून डॉ. सुचित्रा मेहता म्हणाल्या, ‘भारतातील ९५ महिलांमध्ये कुटुंबाची ओढाताण आणि स्वतःच्या आरोग्यविषयी दुर्लक्ष स्तनाच्या कर्करोगाचे देखील उशिराने निदान होते. त्यामुळे आपल्याकडे स्तनाच्या कर्करोगाने दगावणाऱ्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. वास्तविक स्तनाच्या कर्करोगाचे झिरो स्टेजमध्ये निदान झाले तर या कर्करोगावर मात करण्याची शक्यता ९० ते १०० टक्के असते.’
स्तनाच्या कर्करोगाविषयी चिंता व्यक्त करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘देशात झपाट्याने स्तनाच्या कर्करोगाचा विळखा वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हजरात एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण आढळत आहे. आज चीन, अमेरिकेनंतर भारत स्तनाच्या कर्करोगाने झुंजणाऱ्या महिलांच्या पंक्तीत तिसऱ्या स्थानी पोचला आहे. नागपूर जिल्ह्याती फेटरी हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. तिथे ग्रामीण महिलांसाठी निदान शिबिर राबविले जातात. यापुढील टप्प्यात फेटरीसोबतच कवडस, केळझर आणि मुंबईतील पालघर परिसरातही लवकरच कर्करोग निदान शिबिरे घेऊन महिलांचे योग्य ते उपचार सुरू केले जाणार आहेत.’