म. टा. प्रतिनिधी, नागपूर
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजकीय स्वातंत्र्याचे समर्थक होते. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या हाती सर्व प्रकारची सत्ता जाईल व जातीव्यवस्थेवर आधारित शोषणास दलितांना तोंड द्यावे लागेल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात दलित समाजासाठी संरक्षक व्यवस्था उभी करण्याचा आग्रह धरला होता,’ असे प्रतिपादन भारतीय समाज विज्ञान व अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. महावितरणच्या नागपूर परिमंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, स्वतंत्र मजदूर युनियनचे सरचिटणीस जे. एस. पाटील, अधीक्षक अभियंता यू. बी. शहारे, सम्राट वाघमारे, महेंद्र ढोबळे, समिती अध्यक्ष प्रकाश पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर दलितांना समान न्याय मिळावा म्हणून बाबासाहेबांनी विविध क्षेत्र विशेषाधिकार किंवा आरक्षणाची मागणी केली. स्वातंत्र्याआधी ते मिळावे असा त्यांचा आग्रह होता. या त्यांच्या भूमिकेमुळे सर्व पक्षांनी त्यांना ब्रिटिशसमर्थक ठरवले. मात्र, गांधीजींनी त्यांचा उल्लेख उच्च कोटीचे देशभक्त असाच केला होता, असे डॉ. थोरात म्हणाले.
१९२० ते १९५० हा कालखंड देशाच्या बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या काळात निर्माण झालेल्या प्रत्येक मुद्यावर आणि प्रश्नाबाबत बाबासाहेबांनी आपले वैचारिक योगदान दिले आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, स्वातंत्र्य पाकिस्तानची निर्मिती, संविधान, पाणी व ऊर्जा धोरण, राज्य पुनर्रचना अशा सगळ्या विषयांवर बाबासाहेबांनी परिणामकारक मते व्यक्त केली होती. त्यामुळे, राष्ट्राच्या पुनर्बांधणीमध्ये त्यांचे प्रत्येक क्षेत्रात मौल्यवान योगदान होते, असेही ते म्हणाले. तिरपुडे यांनी सम्राट अशोक, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारात समान धागा असल्याचे मत व्यक्त केले. सम्राट अशोक आणि महात्मा फुले यांच्या विचारांवरही त्यांनी प्रकाश टाकला. पाटील यांनी डॉ. आंबेडकरांच्या कामगारविषयक कामाचा आणि विचारांचा आढावा घेतला. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक, तर सचिन नाईक यांनी संचालन केले.