नागपूर : बटाईने शेती करून कापसाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्याने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंगणा हद्दीतील कान्होलीबारा येथे उघडकीस आली. उमेश नत्थूजी गोहणे (३५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. उमेश यांची स्वतःची शेती नव्हती. त्यांनी बटाईने काही शेती घेतली होती. उमेश आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब शेती करीत असे. त्यांनी यंदा कापसाचे पीक घेतले होते. परंतु, निपिकीमुळे त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. हे नुकसान बोंडअळीमुळे झाले की इतर कारणाने झाले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अनेकांचे देणे शिल्लक असल्याने गेल्या काही दिवसांपासून उमेश तणावग्रस्त असल्याचे सांगितले जाते. या तणावापायी त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. यावेळी त्यांनी अतिमद्यप्राशनही केले होते, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कापूस उत्पादकाची हिंगण्यात आत्महत्या
बटाईने शेती करून कापसाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्याने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंगणा हद्दीतील कान्होलीबारा येथे उघडकीस आली.
Maharashtra Times 19 Dec 2017, 4:00 am