म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
नागपुरातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नालॉजीला पहिल्याच वर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे येथील प्रवेश क्षमता १२० जागांनी वाढवण्याचा निर्णय गव्हर्निंग मंडळाने घेतला आहे. त्याबाबत लवकरच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव सादर होणार असून, येत्या शैक्षणिक सत्रात जागा वाढण्याची शक्यता आहे.
आयआयआयटी नागपूरला पहिल्या वर्षी सायन्स इंजिनीअरिंगमध्ये ४० जागा होत्या. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्सला देखील ४० जागा मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु, आता सायन्स इंजिनीअरिंगमध्ये ८० जागा वाढीचा प्रस्ताव असून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनमध्ये ४० जागा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही ब्रान्चेसला अनुक्रमे १२० आणि ८० इतक्या प्रवेश क्षमता होणार आहे.
आयआयआयटी नागपूरला कसा प्रतिसाद मिळतो, त्यावर त्याचे पुढील विकासाचे निर्णय अवलंबून होते. राज्य सरकारने आयआयआयटीकरिता जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तर बीएसएनएलची तात्पुरती जागा देण्यात आली आहे. परंतु, पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यानेच जागा वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी सांगितले.
पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशीप (पीपीपी) तत्त्वावर नागपूर आणि पुणे येथे आयआयआयटी स्थापन करण्याचा करण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. परंतु, तब्बल सात वर्षे दोन्ही प्रस्ताव रखडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानेच नागपुरातील आयआयआयटी सुरू झाले आहे. सुरवातीला दोन्ही शाखांना प्रत्येकी ६० जागा मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु, अपुरी जागा आणि विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळेल की नाही, यासारख्या कारणांमुळे प्रत्येकी ४० जागाच मंजूर करण्यात आल्या. परंतु, पहिल्या वर्षी प्रवेशाच्या पहिल्या दोन फेरीतच सर्व जागा भरण्यात आल्यात. त्यामुळे नागपूरला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन प्रवेश क्षमता वाढवण्यात आल्या आहेत. १२० विद्यार्थ्यांकरिता आवश्यक असणारी सर्व पायाभूत व निवास सुविधा उपलब्ध करून देण्यता येणार असल्याचे गुलाबराव ठाकरे यांनी नमूद केले.