म. टा. प्रतिनिधी, नागपूर
‘चीनच्या नेत्यांनी युध्दाच्या भाषेचा केलेला प्रयोग अयोग्य आहे. चीनने अधिक आक्रमक भाषा वापरण्याचीही गरज नाही. भारतीय लष्कर अशी परिस्थिती हाताळण्यात सक्षम आहे. चीनच्या युध्दाच्या भाषेला ठोस उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असे प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी केले.
उत्तराखंडच्या चमोली भागात चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. नागपूरच्या छोटेखानी दौऱ्यात पत्रकारांनी रावत यांना या मुद्यावर छेडले असता, त्यांनी या घुसखोरीबद्दल घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर ते प्रथमच संघ मुख्यालयाच्या भेटीसाठी नागपुरात आले आहेत. नागपुरातील उद्योगपतींच्या कार्यक्रमालाही ते हजेरी लावणार आहेत.
ज्या भागात चीनचे सैन्य घुसले तो सीमाप्रश्नी अद्याप न सुटलेला भाग आहे. या भागात सीमाआखणी नसल्याने शस्त्राशिवाय चीन व भारताचे सैन्य या परिसरात फिरत असतात. कधी कधी तर भारताचे सैन्य चीनमध्ये व चीनचे सैन्य भारतीय हद्दीतही शिरतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. चीन कुठलेही युध्द जिंकू शकतो, असा अतिआत्मविश्वासही त्यांच्या लष्करप्रमुखाने व्यक्त केल्याकडे लक्ष वेधताच, रावत म्हणाले, चीनच्या नेत्यांनी अधिक आक्रमक बोलण्याची गरज नाही. भारतीय लष्कर युध्दाला तोंड देण्यास सक्षम असून, तशी तयारीही आहे.
संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी कोणत्या विषयावर चर्चा होणार, अशी विचारणा केली असता, आापण स्वयंसेवक असल्याने संघाकडून प्रेरणा घेऊन जाण्यास आलो’ असे सांगत थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. रावत यांनी यावेळी कुठलेही राजकीय विधान केले नाही की, सरसंघचालकांसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही दिला नाही. आपला हा दौरा विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनच्या सदस्यांसोबत भेटून डिसेंबरमध्ये उत्तराखंडमध्ये आयोजित गुंतवणूकदारांच्या परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी असल्याचेही रावत यांनी शेवटी स्पष्ट केले.