म.टा. प्रतिनिधी, नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वृश्चिक रास असून त्यांच्या राशीत शनीचे शेवटचे भ्रमण आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांची लोकप्रियता कमी होईल. २०१९च्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळेल, मात्र स्पष्ट बहुमत मिळणार नाही. मोदींच्या भाग्यात पुन्हा पंतप्रधान बनण्याचा योग आहे, मात्र २०२२ मध्ये राजकीय संकट कोसळण्याची शक्यता असून त्यात पंतप्रधानपदही जाऊ शकते, असा दावा ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी केला.
अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनानिमित्त नागपुरात आल्यानंतर जकातदार यांनी राजकीय भविष्य वर्तविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भविष्य सांगताना त्यांनी मोदींना पुढील काळ कठीण जाणार असल्याचे सांगितले. शनी-मंगळाची युती त्रासदायक असल्याने जवळचे लोक त्यांचा विरोध करू शकतात. पक्षात यामुळे बंडखोरी होण्याची शक्यताही जकातदार यांनी वर्तविली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचीही वृश्चिक रास आहे. राहुल गांधी यांच्यासाठी मात्र पुढील अडीच वर्षांचा काळ चांगला आहे. येणाऱ्या काळात राहुल गांधी यांची लोकप्रियता अधिक वाढेल. शनीचे भ्रमण धनू राशीत असल्याने राहुल यांचे म्हणणे लोकांना पटायला लागेल. राहुल यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष पुढील काळात मजबूत होईल असा दावाही जकातदार यांनी केला. मोदी आणि राहुल या दोघांचीही रास वृश्चिक आहे. दोघांवर शनीचे भ्रमण आहे. मात्र, शनी वयाप्रमाणे फळ देतो. बेचाळीशीनंतरचा काळ आता राहुल यांच्यासाठी चांगला जाईल, असेही जकातदार यांचे म्हणणे आहे.
--महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग!
धनू राशीत शनी आला आहे. आतापर्यंत वृश्चिक राशीत शनी असल्याने गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात हवे तसे महत्त्वाचे निर्णय झाले नाहीत. मात्र, आता धनू राशीत शनी असल्याने महाराष्ट्राला यश मिळेल. येणाऱ्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल. निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या नसल्याने निवडणुकीतील तंतोतंत अंदाज वर्तविणे शक्य नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात २०१९ च्या निडवणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा योग असल्याचा दावाही जकातदार यांनी केला.