म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी देताच अवघ्या काही तासांतच राणेंनी नागपूर गाठत ‘रामगिरी’ येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला. गुजरातसह हिमाचलप्रदेशमध्येही भाजपची सत्ता आल्यानंतर राणे लगेच नागपूरला आले.
'नारायण राणे हे भाजपसोबत आहेत. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामावून घेतले जाईल. त्यांना आमच्या कोट्यातून मंत्रिमंडळात घेतले जाणार असल्याने शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच नाही,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुयोग येथे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. यानंतर अवघ्या आठ तासांत राणे नागपुरात दाखल झालेत. सायंकाळी त्यांनी लगेच रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांशी १५ मिनिटे चर्चा केली. त्यांच्यासोबत आमदार नीतेश राणे आणि कालिदास कोळंबकर होते.
नारायण राणे यांनी काँग्रेसचा त्याग करताना विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश न करता, स्वाभिमानी पक्षाची स्थापना करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाले. यानंतर अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत ते कुठल्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. तथापि, नववर्षाच्या प्रारंभी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यासाठी भाजपने तजवीज केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. गुजरात व हिमाचलप्रदेशातील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.