म. टा. प्रतिनिधी, नागपूर
मानसिक आजाराचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. दुर्दैवाने या आजाराकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. विदर्भाची लोकसंख्या तीन कोटीच्या जवळपास आहे. त्या तुलनेत मनोविकारावर फुंकर घालणारे मनुष्यबळच अपुरे आहे. विदर्भात अवघे ११० मानसोपचारतज्ज्ञ आहे. लोकसंख्येशी याची सरासरी काठली तर एका मानसोपचार तज्ज्ञाला तीन लाख लोकसंख्येचा भार पेलावा लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले.
मानसोपचार विशेषज्ञांच्या संघटनेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे पार पडला. त्यानुषंगाने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद सावजी आणि डॉ. निखील पांडे यांच्याशी संवाद साधला असता मानसिक विकारांची दाहकता वाढत असून मानसोपचार तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणत गरज असल्याचे स्पष्ट झाले. विदर्भातील एकूण तज्ज्ञांपैकी ६३ मानसोपचार तज्ज्ञ उपराजधानीत आहेत. या तुलनेत नागपूर वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये मानसोपचारतज्ज्ञांची वानवा आहे.
एकूण लोकसंख्येच्या २ टक्के स्क्रिझोफेनियाचे प्रमाण असते. नैराश्यात अडकलेल्यांची संख्या २० टक्क्यांपेक्षा जास्त असते. याशिवाय चिंतारोग असलेल्या व्यक्तींची संख्या ३० टक्क्यांपर्यत असल्याचे सांगत नवीन कार्यकारिणीतर्फे शहरात मानसिक विकारावर जनजागरण मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याचे डॉ. पांडे म्हणाले. रविवारी मानसोपचार विशेषज्ञांच्या संघटनेचा पदग्रहण सोहळ्यात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. एन जे. सावजी प्रमुख पाहुणे होते.
--शॉक ट्रिटमेंट प्रभावी मनाचे योग्य पोषण आणि संवर्धन केल्यास मनोरोग टाळता येतात. परंतु मानसिक विकारातील स्क्रिझोफ्रेनिया तसेच जे मनोरुग्ण स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाला इजा पोहवू शकतात, अशा मानसिक विकारग्रस्तांवर शॉक ट्रिटमेंट प्रभावी आहे. औषधांपेक्षा कमी वेळात शॉक ट्रिटमेंटचा प्रभाव दिसून येत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आनंद सावजी यांनी सांगितले.