vinod.waghamare @timesgroup.com
Tweet : @vinodMT
lalit.patki @timesgroup.com
Tweet : @lalitpatkiMT
सुकमा (छत्तीसगड) : ज्या तिरंग्यात लपेटून सुकमा हल्ल्यातील २५ जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला तो राष्ट्रध्वज म्हणजे काय हे छत्तीसगडच्या दुर्गम भागात ठाऊक नाही असे म्हटले तर विश्वास बसेल? जगण्या-मरण्याच्या संघर्षात अडकलेल्या आदिवासींना अगदी अलीकडेपर्यंत याच वास्तवाने जखडून ठेवले होते. भारताचा राष्ट्रध्वज कोणता या प्रश्नाचे उत्तर न देऊ शकणाऱ्या मुलांची संख्या दोन वर्षांपूर्वी ४ हजार होती. हळूहळू परिस्थिती बदलेल. डौलाने वर जाणाऱ्या राष्ट्रध्वजापासून अनभिज्ञ असलेल्या मुलांची संख्या आता दीड हजारांपर्यंत खाली आली आहे. त्यासाठी कारणीभूत ठरले नीरजकुमार बनसोड या मराठी माणसाचे प्रयत्न. सुकमाचे जिल्हाधिकारी ही त्यांची खरी प्रशासकीय ओळख.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीचे पाश तोडून सात दशके उलटली. स्वातंत्र्याची संकल्पना आणि प्रतिके देशभर पोहचली हा मात्र भ्रम ठरला. आदिवासी समाज अजूनही दहशत झुगारून स्वातंत्र्य उपभोगण्याच्या रांगेतच उभा असल्याचे दृश्य दुर्गम प्रदेशात झळकते. सुकमा जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींना राष्ट्रध्वज, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनाचा थांगपत्ता नाही. लाल सलाम ही हाळी त्यांच्या परिचयाची आहे. काळ्या झेंड्यांच्या दहशतीने त्यांच्या आयुष्याचा बेरंग करून टाकला. तिरंग्यावरील चक्रात आरे किती, या प्रश्नावर कदाचित शहरी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. आदिवासी विद्यार्थ्यांना मात्र राष्ट्रध्वजातील तीन रंगांची देखील माहिती नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा कबुलीजबाब दिला. अर्थात, अनभिज्ञांची ही संख्या कमी केल्याचे मोठे समाधानही त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
ज्या नक्षल्यांनी २००४-०९ या दरम्यान एकट्या सुकमा जिल्ह्यातील तब्बल १२४ शाळा उद्ध्वस्त केल्या. सुमारे २० हजार मुलांच्या शिक्षणाची दारे त्यांनी बंद केली. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन न बघणाऱ्या मुलांची संख्या होती ४ हजार. २०१५ मध्ये प्रशासनाने या भागात मुसंडी मारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी धोरण आखले. सुकमाच्या जखमा शैक्षणिक उपचारातूनच भरल्या जाणार होत्या. त्यातून सुकमा येथे ‘एज्युकेशन सेंटर’ आणि दुर्गम भागातील १४ ठिकाणी ‘एज्युकेशन हब’ सुरू झाले. शैक्षणिक केंद्रात आज सुमारे ५ हजार मुलांचे शिक्षण सुरू आहे. सरकारने त्यांच्या राहण्या-खाण्याची निःशुल्क व्यवस्था केली आहे. परिस्थिती बदलू लागली आहे. तोडलेल्या शाळांपैकी ३६ शाळांची पूर्नबांधणी सुरू झाली असून १७ शाळा पूर्ववत झाल्या आहेत. जिल्हाधिकारी बनसोड ही माहिती देत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील कृतार्थतेचे भाव स्पष्ट दिसत असतात.
--मोहफुलाकडून विकासाकडे...
या शैक्षणिक मॉडेलला बनसोड यांनी विविधांगी रूप दिले. ‘डिजिटल लँग्वेज लॅब’, कबाड से जुगाड, आकार, ज्ञानोदय अशा प्रकल्पांची सुरुवात झाली. मुलांना विज्ञानाची गोडी लागावी याकरिता विज्ञान पार्क विकसित करण्यात आला. शाळकरी मुलांनी केंद्रात यावे यासाठी विज्ञान वाहिनी बससेवा सुरू झाली. अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टेम’ (सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग मॅथ्स) हा प्रकल्प सुरु झाला. मोहफुले वेचणारी चिंतागुफासारख्या नक्षलग्रस्त भागातील मुले रहिवासी शाळांमध्ये राहू लागली. यातील दोन विद्यार्थी यंदा चक्क आयआयटी जेईईची परीक्षा उत्तीर्ण झाले. छत्तीसगड सरकारच्या अध्ययन विश्लेषणात (लर्निंग असेसमेंट) सुकमा नेहमी शेवटच्या क्रमांकावर राहायचे. २०१४-१५ मध्ये या जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता केवळ ३८टक्के होती. एकाच वर्षात हा आकडा ५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
--सरकारी सेवांचे आकर्षण
सुकमा जिल्हा तसा प्रशासनापासून दुरावला आहे. परंतु बनसोड यांच्या मार्गदर्शनात ‘नई दिशा केंद्र’ स्थापन करण्यात आले. आदिवासी तरुणांनाही आता सरकारी नोकऱ्या खुणावू लागल्या आहेत. या केंद्रात त्यांना राज्य नागरी सेवा परीक्षेकरिता प्रशिक्षण दिले जाते. यंदा ८ तरुणांनी राज्य नागरी सेवेची ‘प्रीलिम्स’ उत्तीर्ण केली.
--मूळ नागपूरकर !
नीरज कुमार बनसोड हे मूळ महाराष्ट्राचे. नागपुरातील त्रिमूर्तीनगरचे ते रहिवासी आहेत. यशवंतराव चव्हाण इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना छत्तीसगड केडर मिळाले. यापूर्वी त्यांनी दंतेवाडा जिल्ह्याच्या प्रशासकीय सेवेत मोलाचे योगदान दिले. ऑक्टोबर २०१५ पासून त्यांच्याकडे सुकमाच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी आहे.